प्रसादातून विषबाधा: मठाधीश आणि प्रेयसीनेच रचला होता कट
मागच्या आठवडयात कर्नाटकातील एका मंदिरात प्रसादातून विषबाधा झाल्यामुळे १५ जणांचा मृत्यू झाला होता तर १०० जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. या विषबाधा प्रकरणाच्या तपासातून नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे. विश्वस्तांना हटवून मंदिराच्या पैशावर नियंत्रण मिळवण्यासाठी मंदिराच्या मठाधीशानेच हा कट रचल्याचे समोर आले आहे.
मठाधीश, त्याची विवाहित प्रेयसी, तिचा नवरा आणि एका पूजारी अशी चौघांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. १४ डिसेंबरला कर्नाटकातील कोल्लेगलमधील सुलवाडी गावातील मंदिरात विषबाधेची ही घटना घडली होती. या चौघांनी मिळून प्रसादात किटकनाशके मिसळली. त्यामुळे विषबाधा होऊन १५ जणांचा आपले प्राण गमवावे लागले तर १०० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
चौकशी दरम्यान मठाधीश इम्मादी महादेवा स्वामीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. विषबाधेच्या घटनेच्या आठ दिवस आधी मठाधीशाची प्रेयसी अंबिकाच्या घरी एक कृषी अधिकारी आला होता. हा कृषी अधिकारी अंबिकाचा नातेवाईक होता. आपण अंबिकाला किटकनाशकांच्या ५०० एमएलच्या दोन बाटल्या दिल्या होत्या असे या कृषी अधिकाऱ्याने पोलिसांना सांगितले.
बगीच्यातील वनस्पतींसाठी किटकनाशके हवी आहेत असे अंबिकाने आपल्याला सांगितले होते. प्रसादातून विषबाधेमुळे इतक्या लोकांचे मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर त्याने अंबिकाला फोन केला. तेव्हा तिने आपण मठाधीशाच्या सांगण्यावरुन हे सर्व केल्याचे सांगितले. अंबिका आणि स्वामी एकाच गावात राहतात. त्यांचे अनैतिक संबंध आहेत. तामिळनाडू-कर्नाटक सीमेवरील या मंदिरातून वर्षाला १२ लाख रुपये उत्पन्न मिळते. अलीकडेच मंदिराच्या मुख्य विश्वस्ताने इम्मादी महादेवा स्वामीचा प्रस्ताव धुडकावून लावला होता. त्यामुळे विश्वस्ताला हटवण्यासाठी म्हणून त्याने हे सर्व कारस्थान रचले.