“लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही,अफवांवर विश्वास ठेवू नका”-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश 24 मार्च पासून लॉकडाऊन करण्यात आला. त्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यापासून अनलॉक 1च्या माध्यमातून देशासह राज्यातील अनेक सेवा-सुविधा सुरु करण्यास परवागनी देण्यात आली. अनलॉक 1 अंतर्गत जीम, गार्डन्स देखील नागरिकांसाठी खुली करण्यात आली. परंतु, काही ठिकाणी गर्दी व्हायला लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे गर्दी केल्यास पुन्हा लॉकडाऊन करण्यात येईल असा गंभीर इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. त्यानंतर पुन्हा लॉकडाऊन होणारच आहे, अशी चर्चा सर्वत्र होऊ लागली.
काही समाजमाध्यमे, वाहिन्यांवर महाराष्ट्रात परत एकदा लॉकडाऊन लागू होणार असून दुकाने बंद करणार अशा बातम्या प्रसारित होत होत्या. अखेर याबाबत मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही, असं स्पष्ट करत या अफवा असून अशा अफवांवर विश्वास ठेवू नका असही सांगितलं आहे.तसंच गर्दी करु नका, काळजी घ्या, सुचनांचे पालन करा असे आवाहन आणि विनंती उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे. तसंच शहानिशा केल्याशिवाय अशा बातम्या प्रसारित करू नयेत. अफवा पसरविणाऱ्या बातम्या,पोस्ट फॉरवर्ड करणे गुन्हा असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातून स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 97648 वर पोहचला असून 3590 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 47968 रुग्णांवर सध्या उपचार सुरु असून 46078 कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान राज्यात कोरोना बाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. त्यामुळे बाहेर पडण्याची मुभा मिळाली असली तरी काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.