लॉकडाऊनचा सहकार क्षेत्रालाही फटका;पुण्याच्या संत तुकाराम साखर कारखान्यात व्हीआरएस जाहीर
पुणे – कोरोनाला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका सहकार क्षेत्रालाही बसला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील कासारसाई येथील संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याने कामगारांच्या पगारावरील खर्च कमी करण्यासाठी स्वेच्छा निवृत्ती योजना लागू केली आहे. १० वर्षांची सेवा पूर्ण झालेल्या आणि ४५ वर्षांवरील कामगारांसाठी ही व्हीआरएस योजना लागू केली आहे. कारखान्याच्या संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत या योजनेला मंजुरी मिळाली आहे.
कारखान्याच्या कायमस्वरुपी आणि हंगामी अशा दोन्ही कामगारांसाठी ही स्वेच्छा निवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ कारकून, टेलिफोन ऑपरेटर, कृषि सहाय्यक, वाहनचालक, सुरक्षा गार्ड, शिपाई, अभियंता आदींना घेता येणार आहे. यात १० वर्ष सेवेच्या हंगामी कामगाराला झालेल्या सेवाकाळासाठी महिन्याला ७ दिवसांचा आणि शिल्लक सेवेसाठी प्रत्येक वर्षाला १५ दिवसांचा पगार मिळणार आहे. कायम कामगारांना मागील सेवेसाठी १० दिवसांचा पगार आणि शिल्लक सेवेसाठी वर्षाला ६० दिवसांचा पगार दिला जाणार आहे.