…अन् माफी मागत फडणवीसांनी केली पत्रकार परिषदेची सुरुवात; शरद पवारांना धरलं जबाबदार
मुंबई |
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेलं वाहन सापडल्या प्रकरणावरुन एकामागोमाग एक खळबळजनक गोष्टी समोर आणणारे देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. परमबीर सिंह यांनी पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर राष्ट्रवादीकडून सचिन वाझे भेटीचा दावा फेटाळण्यात आला आहे. यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीकडून चुकीची माहिती देण्यात आली असल्याचं म्हटलं आहे. महत्वाचं म्हणजे फडणवीसांनी माफी मागत पत्रकार परिषदेला सुरुवात केली. यामागचं नेमकं कारण काय जाणून घेऊयात.
“पहिल्यांदाच मी आपली क्षमा मागणार आहे. आपल्या नेहमीच्या पद्धतीने आपण सर्वात आधी मराठी आणि नंतर हिंदीत पत्रकार परिषद करतो. पण माननीय शरद पवारांनी हा विषय राष्ट्रीय केला असल्याने आज आपला प्रघात बदलून आणि तमाम मराठी पत्रकारांची, मायमराठीची क्षमा मागून आजची पत्रकार परिषद हिंदीत सुरु करणार आहे,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. दरम्यान यावेळी पत्रकारांनी त्यांना इंग्लिशमध्ये सुरुवात करण्यास सांगितलं असता पवारांएवढं माझं इंग्रजी चांगलं नाही सांगत उपहासात्मक टोला लगावला.
“शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत परमबीर सिंह यांचे दावे खोटे असल्याचं सांगितलं. गृहमंत्री नागपुरात होम क्वारंटाइन होते असं शरद पवार सांगत होते. मी तात्काळ एक व्हिडीओ प्रसिद्ध करत अनिल देशमुख यांनी घेतलेली पत्रकार परिषद दाखवली. पण हे सगळं खरं नाही. अनिल देशमुख खासगी विमानाने आले होते. माझ्याकडे मुंबई पोलिसांचे दोन मॅनिपेस्ट आहेत. शरद पवारांना चुकीची माहिती देण्यात आली. एवढ्या मोठ्या नेत्याच्या तोंडून चुकीच्या गोष्टी वदवून घेत उघडं पाडलं. यामागे कोण आहे याचा विचार राष्ट्रवादीने करायला हवा. विलगीकरणात असतानाही अनिल देशमुखांनी अनेकांच्या भेटी घेतल्या आहेत,” असा दावा फडणवीसांनी यावेळी केला आहे.
वाचा- शरद पवारांकडून चुकीची माहिती दिली गेली; फडणवीसांचा पलटवार