रूळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांत घट
दादर ते परळ, कुर्ला, दिवा स्थानकांतील अपघातांचे प्रमाण कमी
रूळ ओलांडताना होणारे प्रवाशांचे अपघात रोखण्यासाठी मध्य रेल्वे सुरक्षा दलाने केलेल्या शून्य अपघात नियोजनाला चांगले यश आले आहे. २०१९ मध्ये जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत रूळ ओलांडताना लोकल किंवा मेल-एक्स्प्रेसची धडक लागून झालेल्या अपघातांत २४४ जणांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षी या काळात ही संख्या २७१ होती. थोडक्यात ही संख्या २७ने कमी झाली आहे. दादर, परळ, सायन, कुर्ला, ठाणे, दिवा, कल्याण या काही महत्त्वाच्या स्थानकांतील अपघात कमी झाल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाने दिली.
प्रवाशांनी रूळ ओलांडू नये, असे आवाहन रेल्वे स्थानकात उद्घोषणेमार्फत वारंवार केले जाते. तरीही प्रवासी हा धोका पत्करतात. मात्र हा ‘स्टंट’ अनेकांच्या जिवावर बेततो. गेल्या काही वर्षांत या अपघातांचे प्रमाण वाढतच होते. यंदा प्रथमच हे प्रमाण कमी झाले आहे.
हे अपघात रोखण्यासाठी रेल्वे प्रशासन, मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून रुळांशेजारील संरक्षक भिंती, जाळ्या उभारल्या जात आहेत. परंतु संरक्षक जाळ्या किंवा भिंत तोडून प्रवाशी रूळ ओलांडतात आणि अपघात होतात. म्हणून मध्य रेल्वे सुरक्षा दलाने रूळ ओलांडताना होणारे अपघात कमी करण्यासाठी शून्य अपघात नियोजन केले. जानेवारी २०१९ ते एप्रिल २०१९ या चार महिन्यांत या अनधिकृत मार्गाचा आढावा घेऊन ते बंद करण्यासाठी संरक्षक भिंत किंवा जाळ्या उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. रेल्वे सुरक्षा दलाने आपली गस्त वाढवली. याचे सकारात्मक परिणाम दिसून येत असून रूळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांचे प्रमाण घटले. २०१८च्या पहिल्या महिन्यात २४४ जणांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षी ही संख्या २७१ होती. हे प्रमाण आणखी कमी करण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने कृती योजना आखली आहे. त्यासाठी संबंधित विभागांशी संपर्क साधून उपाययोजना करण्यावर भर दिला जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
शून्य अपघातांच्या नियोजनाचा पहिला प्रयोग शिव ते परळ दरम्यान करण्यात आला होता. २०१८ मध्ये या स्थानकांदरम्यान १३ अपघात झाले होते, तर आता हेच अपघाताचे प्रमाण सातवर आले आहे.