रिक्षा चालकांनो कागदपत्रांची पुर्तता करा, अन्यथा कारवाई; वाहतूक पोलिसांचे आवाहन
पिंपरी / महाईन्यूज
अनलॉकनंतर आता रिक्षा वाहतुकीला परवानगी दिली आहे. परंतु, रिक्षाचालक शासनाच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याची बाब समोर येत आहे. रिक्षा अस्थाव्यस्थ पार्क केल्या जात आहेत. रिक्षाचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे. सर्व रिक्षा चालक आणि मालक यांनी 28 ऑक्टोबर पर्यंत स्वच्छ गणवेश, बॅच बिल्ला, लायसन्स व रिक्षाच्या कागदपत्रांची पुर्तता करावी. अन्यथा वाहतूक शाखेकडून कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांनी म्हटले आहे.
टाळेबंदी शिथिल केली जात आहे. रिक्षा चालकांना सामाजिक अंतर आणि योग्य खबरदारी घेऊन प्रवासी वाहतूक करण्यास मुभा देण्यात आली आहे. परंतु, सध्या शहरातील रिक्षा चालक गणवेश परिधान न करता, बॅच बिल्ला, लायसन्स, रिक्षाची कागदपत्रे जवळ न बाळगता प्रवासी वाहतूक करत असल्याचे वाहतूक शाखेच्या निदर्शनास येत आहे, असेही डिसले यांनी म्हटले आहे.
अनेक रिक्षा चालक चौकांमध्ये व रस्त्यावर रिक्षा अस्ताव्यस्त पार्किंग करुन उभे राहतात. यामुळे पिंपरी चिंचवड शहरात रिक्षा चालकांची व वाहतूकीची प्रतिमा मलिन होत आहे. कोरोना साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क, सॅनिटायजर, रिक्षा चालक व प्रवासी यांच्यामध्ये प्लास्टिक पडदा इत्यादींचा वापर करणे बंधनकारक आहे. काही रिक्षा चालक या बाबींची पूर्तता करत नसल्याचे देखील दिसत आहे. रिक्षा चालकांनी ही खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन डिसले यांनी केले आहे.