रिक्षाचालकांच्या संयमाचा अंत पाहू नका, रिक्षा पंचायतचा सरकारला इशारा
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे गेल्या ६ महिन्यांपासून रिक्षा व्यवसाय बंद आहे. सरकारने एसटी, सिटी बसला प्रवासी व्यवसाय करण्यासाठी परवानगी दिली. मात्र, रिक्षा चालकांना अशी परवानगी दिलेली नाही. त्यामुळे रिक्षाचालकांमध्ये तिव्र संताप असून ते सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. रिक्षाचालकांच्या संयमाचा अंत पाहू नका, असा इशारा महाराष्ट्र रिक्षा पंचायतच्या वतीने सरकारला दिला आहे.
रिक्षा चालकांना २ प्रवाशी घेण्याचे बंधन कायम ठेवले आहे. यामुळे रिक्षा चालकांची सर्व बाजूंनी कोंडी होत आहे. शासनाच्या या लहरी निर्णयाविरोधात रिक्षाचालकांना संताप अनावर झाला आहे. कायदा हाती घेण्यापूर्वी सरकारने रिक्षा चालकांवरील सर्व निर्बंध दूर करावेत. दिल्ली, कर्नाटक सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने दहा हजार रुपये महिना अनुदान द्यावे. फायनान्स कंपनीच्या वतीने रिक्षा चालकांना हप्ता वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. त्यांच्यावर कारवाई करावी.
रिक्षाचालक, मालकांसाठी तातडीने कल्याणकारी मंडळ स्थापन करावे. रिक्षा चालकांच्या प्रमुख मागण्या असून सरकारने तातडीने रिक्षा चालकांचे प्रश्न सोडवावेत. अन्यथा महाराष्ट्र रिक्षा पंचायत वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिला आहे. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली रिक्षाचालकांच्या शिष्टमंडळाने नुकतीच पुणे येथे प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांची भेट घेतली. रिक्षाचालकांच्या प्रश्नांचे निवेदन सादर केले.
यावेळी वरिष्ठ उपाध्यक्ष आनंद तांबे, पुणे शहर अध्यक्ष जफर कादरी, कार्याध्यक्ष शफीक पटेल, वरिष्ठ उपाध्यक्ष मोहमद शेख, उपाध्यक्ष अरशद अन्सारी, संजय शिदे, फरहान शेख आदी यावेळी उपस्थित होते. रिक्षा संघटनेच्या शिष्टमंडळाने दिलेले निवेदन सरकारला पाठवून आणि आमच्या कार्यालयाशी संबंधित विषय तातडीने सोडवू असे आश्वासन अजित शिंदे यांनी दिल्याची माहिती बाबा कांबळे यांनी कळविली आहे.