राहुल यांनी शीख विरोधी दंगलीबद्दल माफी मागावी
- बर्लिनच्या भाषणावर भाजपची प्रतिक्रीया
नवी दिल्ली – कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बर्िर्लन येथील भाषणात गुरूनानकदेव यांचा उल्लेख केला होता. त्याचा संदर्भ देत भाजपने त्यांच्यावर पलटवार केला असून 1984 साली शीखांच्या विरोधात झालेल्या दंगलप्रकरणी राहुल गांधी यांनी शीखांची माफी मागावी, तसेच सुवर्ण मंदिरावर करण्यात आलेल्या कारवाईच्या संबंधातहीं त्यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी भाजपने केली आहे. केवळ मतांच्या राजकारणासाठी राहुल गांधी हे गुरूनानकदेव यांचे नाव घेत आहेत अशी टीकाही भाजपचे राष्ट्रीय चिटणीस आर पी सिंग यांनी केली आहे.
विविधतेत एकता हे सूत्र आम्ही गुरूनानकदेव यांच्या शिकवणुकीतून घेतले असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले असले तरी प्रत्यक्षात मात्र त्यांच्या पक्षाची राजकीय रणनिती ही फोडा आणि झोडा या स्वरूपाचीच राहीली आहे असे त्यांनी म्हटले आहे. शिखांच्या विरोधातील दंगलीत ज्या पक्षाचा हात आहे त्या पक्षाच्या नेत्यांनी गुरूनानकदेव यांचा उल्लेख करणे वेदनादायी आहे असा टोलाही त्यांनी लगावला.
भाजपचे दुसरे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी बर्लिन मधील भाषणावरून राहुल गांधी यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की त्यांनी तेथील भाषणात भारतीय संस्कृतीचा अवमान केला आहे. देशाचे नृेतृत्व करण्याची बाब सोडा पण एखाद्या राजकीय पक्षाचे नेतृत्व करण्या इतकीही त्यांची क्षमता नाही असेही त्यांनी म्हटले आहे.