‘शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचे उद्योग बंद करा’, खोत यांचा शेट्टींना टोला
दिल्लीतील कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलनला महाराष्ट्रातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी पाठिंबा दिला आहे. यावरून रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवर जोरदार हल्ला चढवला आहे.
एकीकडे सत्तेत राहून आंदोलन करायचे आणि दुसऱ्या बाजूला राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या सोबत राहून आमदारकीसाठी बारामतीला जाऊन आमरस, गोड चहा घ्यायचा, अशी दुटप्पी भूमिका काहीजण घेत आहे. अजून किती दिवस साखरेचा गोड चहा घेत राहणार, किती दिवस आमरस खात राहणार, आता हे सर्व सोडून शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचे उद्योग बंद करा, अशी जोरदार टीका खोत यांनी नाव न घेता राजू शेट्टींवर केली आहे. ते ठाण्यात बोलत होते.
एका बाजूला सत्तेत राहून आंदोलन करायचे आणि दुसऱ्या बाजूला कारखाना मालकांच्या मांडीला मांडी लावून बसायचे हे उद्योग बंद करा. खोटे बोलून फक्त आमदारकी मिळाली यासाठीचे हे प्रयत्न शेतकऱ्यांना दिसत आहे, असा टोला देखील त्यांनी लगावला.