राष्ट्रवादीच्या नेत्यांवरील होणाऱ्या कारवाईबाबत जयंत पाटलांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले…
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी आपली भूमिका मांडली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. “पक्षाच्या अंतर्गत परिस्थितीचा आढावा नक्की घेतला जाईल. आवश्यकता भासली तर मुख्यमंत्र्यांशीही चर्चा करु. तथ्याच्या आधारे योग्य त्या भूमिका घेऊ,” असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
धनंजय मुंडे आणि नवाब मलिक यांच्या राजीनाम्याबाबत ते म्हणाले की, “राजीनामा कोणीतरी आरोप केला म्हणून देणं ही बाब होणार नाही. पण या बाबतीत आम्ही पक्ष स्तरावर योग्य ती चर्चा करणार आहोत. धनंजय मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी जर कोणी ब्लॅकमेल करत असेल, त्यांचा काही दोष नसेल तर राजीनामा घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही. संबंधित यंत्रणा जिथे त्यांनी तक्रार केली आहे त्यांच्याकडून सगळी माहिती घेतल्यानंतर त्या यंत्रणा भूमिका घेतील, त्यानंतर आम्ही विचार करु.”
“नवाब मलिक यांच्याबाबतीत बोलायचं गेल्यास त्यांच्या जावयाने केलेली एखादी चूक असेल, केलीय की नाही ते माहिती नाही, ते चौकशीदरम्यान कळेल. पण त्यांच्या सासऱ्यावर परिणाम होण्याचं काही कारण नाही. या दोन्ही प्रकरणात सरकार कोणताही हस्तक्षेप करत नाही,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं.