रामायण, महाभारतनंतर आता शाहरूख खानची सर्कस मालिकाही दूरदर्शनवर
लॉकडाऊनच्या काळात रामायण, महाभारतनंतर आता शाहरुख खानची सर्कस ही मालिकाही प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे…बॉलिवूडमधील सुपरस्टार शाहरुख खानने ज्या मालिकेच्या माध्यमातून मनोरंजन विश्वात पाऊल ठेवले ती सर्कस मालिका पुन्हा एकदा दूरदर्शन वाहिनीवरून प्रक्षेपित करण्यात आली आहे…अझिझ मिर्झा यांनी १९८९ मध्ये सर्कस मालिकेचे दिग्दर्शन केले होते. आज, शनिवारपासून संध्याकाळी ८ वाजता ही मालिका दूरदर्शनवर बघायला मिळणार…
या संदर्भात दूरदर्शनने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, शाहरुख पुन्हा एकदा डीडी वाहिनीवर येतोय. तुम्ही घरीच थांबा आणि पाहा शाहरूख खानची सर्कस टीव्ही मालिका. २८ मार्चपासून रात्री ८ वाजता.
सर्कस मालिकेमध्ये शाहरूख खानसोबत अभिनेत्री रेणूका शहाणे आणि सध्याचे प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी काम केले होते. सध्या २१ दिवसांसाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जारी करण्यात आल्यामुळे सगळेजण घरातच आहेत. त्यामुळेच मनोरंजनासाठी दूरदर्शन पूर्वी प्रचंड गाजलेल्या मालिका पुनर्प्रक्षेपित करण्याचे ठरविले आहे. सर्कससोबत रजत कपूर यांची व्योमकेश बक्षी ही मालिका सुद्धा दूरदर्शनवर दाखविण्यात येणार आहे.