‘राफेलच्या चौकशीची मागणी भाजपला टाळता येणार नाही’
टू जी गैरव्यवहाराच्या चौकशीच्या मागणीसाठी संसदेचे कामकाज बंद पाडणाऱ्या भाजपला राफेल विमान खरेदीच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती नेमण्याची विरोधकांची मागणी टाळता येणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी मांडली.
बोफोर्सवरून भाजपने आकाश पाताळ एक केले होते. टू जी गैरव्यवहाराच्या चौकशीसाठीही भाजपने आक्रमक भूमिका घेतली होती. संसदेचे संपूर्ण अधिवेशन बंद पाडले होते. ही पाश्र्वभूमी लक्षात घेता राफेल विमान खरेदीबाबत झालेल्या आरोपप्रकरणी चौकशीची मागणी सत्ताधाऱ्यांना मान्य करावीच लागेल. राफेल विमान खरेदीबाबत आरोप होत असतानाच संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन फ्रान्सच्या दौऱ्यावर गेल्याबद्दलही आश्चर्य वाटते, असेही पवार म्हणाले.
राफेल विमाने चांगलीच आहेत, त्याबद्दल दुमत नाही. फक्त खरेदीच्या किमतीबाबत काही आक्षेप आहेत. याबद्दल लोकांच्या मनात संशय निर्माण झाला आहे. तो सरकारला दूर करावा लागेल. अन्यथा त्यात काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय निर्माण होऊ शकतो, असेही पवार यांनी सांगितले.
प्रकाश आंबेडकर आणि एमआयएम एकत्र आले तरीही त्याचा राज्यात फारसा परिणाम होणार नाही. कारण मुस्लीम समाज हा विचारपूर्वक मतदान करतो, अशी पुष्टीही पवार यांनी जोडली.
मतदान यंत्रांबाबत १५ दिवसांत बैठक
मतदान यंत्रांबाबत विरोधी पक्षांनी काही आक्षेप नोंदविले आहेत. पुन्हा पारंपरिक मतदान पद्धत (बॅलेट) अमलात आणावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या संदर्भात १५ दिवसांमध्ये विरोधी पक्षनेत्यांची बैठक होत आहे. तीत व्यूहरचना निश्चित केली जाईल. मतदान यंत्रांच्या मुद्दय़ावर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सर्व पक्षांच्या नेत्यांना पत्र पाठवून निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे. परंतु, बहिष्काराचे अस्त्र कोणालाही मान्य होणार नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.