राज्य सरकार लवकरच पॅकेज जाहीर करणार, अजित पवारांची घोषणा
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज पीसीएनटीडी तर्फे औंध ते काळेवाडी साई चौक येथे उभारण्यात आलेल्या पुलाचे उद्घाटन झाले. गेल्या तीन महिन्यांपासून पूल तयार असूनही, तो उद्धाटनाअभावी वापराविना रखडला होता. अखेर आज अजित पवारांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन झालं. यावेळी अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना लॉकडाऊनसह राज्याच्या अर्थचक्राबाबत भाष्य केलं. राज्य सरकार लवकरच पॅकेज देणार आहे, असं अजित पवार म्हणाले.
केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन त्यांच्या पातळीवर कोरोना रोखण्याचे प्रयत्न करत आहे. शहरी भागातून स्थलांतर झाल्याने ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. पण खबरदारी घेतली तर घाबरण्याचे कारण नाही, असं त्यांनी सांगितलं
यावेळी अजित पवारांनी लॉकडाऊनबाबत अंदाज व्यक्त करताना राज्य सरकार पॅकेज जाहीर करणार असल्याच सांगितलं. ते म्हणाले, “आज लॉकडाऊनबद्दल भारत सरकार काय निर्णय घेतंय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर करतीलच. पण माझ्या अंदाजाने वेगवेगळ्या राज्यांवर ते जबाबदारी देण्याची शक्यता आहे. कारण गेल्या अडीच महिन्यापासून सर्व कामकाज ठप्प आहे. यामुळे आर्थिक संकट उभे राहिले आहे. यावर आपल्याला मार्ग काढायचा आहे. यासाठी राज्य सरकार लवकरच पॅकेज देणार आहे. यासाठी मंत्रिमंडळाची बैठक पार पडेल. केंद्राकडून 21 लाख कोटींचे पॅकेज देण्यात आले, पण प्रत्येक राज्यातील जनतेच्या हातात प्रत्यक्षात किती मदत येणार याबाबत अनेक मतप्रवाह आहेत. काही म्हणतात हे नुसते मोठे आकडे पहायला मिळाले. गरीब जनतेलाही मदत मिळायला हवी, त्यासाठी आम्ही केंद्राकडे पाठपुरावा करतोय”.