राज्याचा पारा घसरला
उत्तरेकडून येणारे थंड वाऱ्यांचे प्रवाह तीव्र झाले असतानाच राज्यात कोरडे हवामान निर्माण झाल्याने प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात थंडीची लाट आली आहे. मराठवाडय़ासह राज्याच्या इतर भागांतही किमान तापमानात घट झाल्याने गारठय़ामध्ये वाढ झाली. हा कडाका आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
उत्तर भारतातील राज्यांमध्ये सध्या तीव्र गारठा आहे. या भागातून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहांमुळे राज्यातील बहुतांश भागातील किमान तापमानात घट नोंदविली जात आहे. बंगालच्या उपसागरामधील पेथाई चक्रीवादळाने बाष्प खेचून आणल्याने पूर्व विदर्भातील काही भागांत दोन दिवसांपूर्वी पावसाने हजेरी लावली. मागील चोवीस तासांमध्ये मराठवाडय़ातही तुरळक ठिकाणी पाऊस पडला. त्यामुळे हवेत आणखी गारवा निर्माण झाला आहे. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत लक्षणीय घट नोंदविण्यात आली आहे. या भागात थंडीची लाट आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या आसपास आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यातच कमी-अधिक प्रमाणात थंडी आहे.
किमान तापमान (अंश सेल्सिअस)
मुंबई (कुलाबा) २०.२, सांताक्रूझ १७.४, अलिबाग १७.०, रत्नागिरी १८.८, पुणे ९.३, जळगाव ९.४, कोल्हापूर १४.५, महाबळेश्वर १०.१, नाशिक ७.९, सांगली १३.१, परभणी ११.०, नांदेड १५.०, नागपूर ९.६, वर्धा १०.५, यवतमाळ १०.२.