राज्यसभेत तृणमूलच्या खासदारांनी सभापतीच्या समोरील नियमावली पुस्तिका फाडल्याने प्रचंड गदारोळ
मोदी सरकारच्या तीन कृषि क्षेत्राशी संबंधित दोन विधेयकावरून राज्यसभेत प्रचंड गदारोळ सुरू आहे. त्यातच तृणमूलच्या खासदारांनी सभापतीच्या समोरील हौद्यात उतरून नियमावली पुस्तिका फाडल्याने अजून गोंधळ निर्माण झाला. सरकारच्या दोन्ही विधेयकांना मंजुरी देण्यास विरोधकांनी तीव्र विरोध केला आहे. काँग्रेससह विरोधी पक्षातील खासदार आक्रमक झालेले बघायला मिळाले. शेतकऱ्यांना प्रस्तावित कायदे त्यांच्या आत्म्यावर हल्ला केल्यासारखी वाटत आहे. त्यामुळे आम्ही या मृत्यूच्या वॉरंटवर स्वाक्षरी करणार नाही, अशी भूमिका घेत सरकारवर टीका केली. यावेळी तृणमूलच्या खासदारांनी सभापतीच्या समोरील हौद्यात उतरून नियमावली पुस्तिका फाडली. गदरोळ सुरू झाल्यानं कामकाज तहकूब करण्यात आलं.
शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य , शेतकरी दर हमी ही दोन विधेयक केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी राज्यसभेत मांडली. हे दोन्ही कायदे ऐतिहासिक असून, शेतकऱ्यांच्या आयुष्यात आमुलाग्र बदल घडवून आणतील. शेतकरी त्यांचा शेतमाल देशभरात कुठेही मुक्तपणे विकू शकतील. मी शेतकऱ्यांना आश्वासित करतो की ही विधेयके एमएसपीशी संबधित नाहीत, असं तोमर यांनी विधेयक मांडताना सांगितलं.
त्यानंतर सभागृहात काँग्रेससह विरोधी बाकांवरील पक्षांनी विधेयकांवरून सरकारवर टीका केली. द्रमुकेचे खासदार एलेंगोवन म्हणाले,”देशाच्या एकूण जीडीपीत शेतकऱ्यांचं योगदान २० टक्के आहे. त्यांना या विधेयकांद्वार गुलाम बनवलं जाईल. हे विधेयकं शेतकऱ्यांना मारून टाकतील आणि वस्तू बनवून टाकतील,” अशी टीका त्यांनी केली.
काँग्रेसचे खासदार प्रताप सिंह बाजवा म्हणाले,’काँग्रेस या विधेयकांना विरोध आहे. पंजाब, हरयाणातील शेतकऱ्यांची अशी भावना आहे की ही विधेयक त्यांच्या आत्म्यावर हल्ला आहे. या विधेयकांना सहमती देणं म्हणजे शेतकऱ्यांच्या मृत्यूच्या वॉरंटवर स्वाक्षरी करण्यासारख आहे. शेतकरी एपीएमसी आणि एमएसपीतील बदलांच्या विरोधात आहे,” असं बाजवा यांनी सभागृहात सांगितलं.
त्यावर कृषिमंत्री तोमर यांनी एमएसपीशी दोन्ही विधेयकांचा काडीचाही संबंध नाही. शेतमालाची एमएसपीनं खरेदी केली जात आहे आणि केली जाईल. यावर कुणीही शंका घेण्याची गरज नाही. मात्र, यावर विरोधकांचं समाधान झालं नाही. काँग्रेस, आम आदमी पक्षाचे खासदार सभापतीच्या समोरील हौद्यात उतरले. गुलाम नबी आझाद यांनी चर्चेची वेळ वाढवण्याची मागणी केली. मंत्र्यांनी उद्या उत्तर द्यावं, असं सदस्यांची इच्छा आहे. मात्र, तोमर यांचं निवेदन सुरूच होतं. त्यावर संतप्त झालेल्या खासदारांनी त्यांच्यासमोरील माईक तोडले. तर तृणमूलचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी थेट सभापतीसमोर जाऊन सभागृह नियमावली पुस्तिकाच फाडली.