‘हे तर बालिशपणाचे राजकारण’, स्मृती इराणींचे राहुल गांधींना प्रत्युत्तर
नवी दिल्ली – केंद्रीय अर्थसंकल्पात जवानांसाठी संरक्षण क्षेत्रातील तरतूदीमध्ये वाढ का केली नाही ? असा सवाल काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी उपस्थित केला होता. राहुल गांधींच्या या टीकेला आता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
राहुल गांधी जवानांच्या नावाने बालिशपणाचे राजकारण करत असल्याची टीका इराणी यांनी केली आहे. स्मृती इराणी म्हणाल्या की, राहुल गांधी यांनी अर्थसंकल्प ना व्यवस्थित वाचला ना पाहिला. ते चीनची गोष्ट करत आहेत. कदाचित त्यांना त्यांच्या परिवाराचा इतिहास वाचण्याची गरज आहे की, चीनसोबत त्यांच्या परिवाराचे कसे घनिष्ट संबंध राहिलेले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवाळी सारखा आनंद आणि प्रकाशाचा सण सीमेवर जवानांसोबत साजरा करतात. त्यावेळी जनतेचे प्रतिनिधी म्हणून ते जवानांना संदेश देतात की आम्ही तुमच्यासोबत आहोत. अशा मुद्यावर राहुल गांधी अगदीच बालिशपणाचे राजकारण करत आहेत. गलिच्छ राजकारण करणाऱ्यांनाच याच त्रास होतो, अशी बोचरी टीका इराणींनी राहुल गांधींवर केली.
दरम्यान, याआधी राहुल गांधींनी ट्विट करत अर्थसंकल्पावरून मोदी सरकारवर निशाणा साधला होता. चीनने भारताच्या भूमीवर कब्जा केला आणि आमचे अनेक सैनिक शहीद झाले. पंतप्रधान फोटो ऑपसाठी सैनिकांसोबत दिवाळी साजरी करतात. मग त्यांनी जवानांसाठी संरक्षण बजेट का वाढवलं नाही?, असा सवाल त्यांनी ट्विटच्या माध्यमातून विचारला होता.