राज्यभरात प्लॅस्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई
लाखोंचा दंड वसूल : कारवाई आणखी तीव्र करण्याचा इशारा
मुंबई – प्लॅस्टिकबंदीची अंमलबजावणी झाल्यानंतर राज्यभरात आज प्लॅस्टिक वापरणाऱ्यांवर धडक कारवाई सुरु करण्यात आली आहे. प्लॅस्टिक वापरणाऱ्याला पाच हजार रुपये दंडाची पावती दिली जात आहे. मुंबई, पुण्यासह राज्यातील अन्य महापालिकेच्या पथकाकडून सकाळपासून कारवाया करत लाखो रुपयांची दंड वसुली करण्यात आली. ही कारवाई आणखी तीव्र करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
राज्यात कॅरीबॅग, ग्लास आणि थर्माकोल बंदी असल्याने राज्य शासनाच्या आदेशानुसार महानगरपालिका,नगरपालिका आणि जिल्हा परिषद यांच्या मार्फत कडक कारवाई करण्यात येत आहे. सांगलीतही प्लॅस्टिक बाळगणाऱ्या दुकानावर महापालिकेने छापे टाकून हजारो रुपयांचा प्लॅस्टिक आणि थर्माकोलचा साठा हस्तगत करून दंडात्मक कारवाई केली आहे.
महापालिकेने आपल्या 15 भरारी पथकाच्या माध्यमातून आज जवळपास 50 हजार रुपये दंड वसूल केला, तर अंदाजे एक टन प्लॅस्टिक पिशवी आणि अन्य प्लॅस्टिक जप्त केले आहे. यामध्ये सांगली शहरात मुख्य बाजार पेठेत छापे टाकून अनेक दुकानातून प्लॅस्टिक तसेच थर्माकोलचे साठे जप्त करण्यात आले आहेत.
अकोला महापालिकेने पहिल्या दिवशी तेलीपुरा चौकात प्लॅस्टिकविरोधात एक कारवाई केली. यात दुकान मालकाला तीन हजारांचा दंड करण्यात आला. नांदेड-वाघाळा महापालिकेच्या सहा पथकांमार्फत शहरात तपासणी करण्यात आली. सकाळपासून चार कारवाई करत 20 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच नाशिकमध्ये 72 जणांवर कारवाई करत 350 किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. या पथकाने 3 लाख 60 हजार रुपयांचा दंड वसूल केला.
दरम्यान, प्लॅस्टिक विरोधी कारवाई उद्यापासून अधिक तीव्र होणार असून मंगल कार्यालये, मटण आणि चिकन मार्केट, मंडई, बाजार येथेही तपासणी करण्यात येणार असल्याचे पथकातील अधिका-यांनी सांगितले. या कारवाईमुळे व्यापारीवर्गात प्रचंड नाराजी पाहण्यास मिळत आहे, तर नागरिकांनी प्लॅस्टिक बंदीचे समर्थन केले आहे.