राजीव गांधी यांचे भारतरत्न काढून घेण्याची मागणी ठरावाचा भाग नाही – रामनिवास गोयल
आम आदमी पक्षाने दिल्ली विधानसभेत १९८४ च्या शीख विरोधी दंगलीबाबत ठराव संमत केला असून त्यात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा भारतरत्न सन्मान काढून घेण्याची मागणी करण्यात आली असतानाच या मागणीचा ठरावात समावेश केलेला नाही असा निर्वाळा दिल्ली विधानसभेचे सभापती रामनिवास गोयल यांनी दिला. भारतरत्न मागे घेण्याची मागणी आमदार जर्नेल सिंग यांनी ठरावात घुसवली होती पण त्यासाठी त्यांनी परवानगी घेतली नसल्याने त्याचा समावेश ठरावात ग्राह्य़ धरण्यात आलेला नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान या ठरावाच्या वेळी सभात्याग करणाऱ्या आमदार अलका लांबा यांना राजीनामा देण्याचा आदेश मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिला असून लांबा या लवकरच राजीनामा देणार आहेत असेही सांगण्यात आले पण नंतर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी लांबा यांचा राजीनामा मागितला नसल्याचे स्पष्टीकरण केले. लांबा यांनीही राजीनामा देणार नसल्याचे त्यानंतर स्पष्ट केले. राजीव गांधी यांचा भारतरत्न किताब काढून घेण्याचा मुद्दा मूळ ठरावात नव्हता अशी भूमिका आम आदमी पक्षाने घेतली आहे. ठरावावरून पक्षांतर्गत वाद झाले असून वरिष्ठ नेत्या अलका लांबा यांनी आधी असे सांगितले की, या ठरावाला पाठिंबा देण्यासाठी माझ्यावर दबाव आणण्यात आला.