‘या’ मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्र पोलिसांना ‘फुलपॅन्ट’ गणवेश मिळाला!
अवघ्या दीड वर्षांच्या कार्यकाळात बेरोजगारांना भत्ता, पोलिसांसाठी फूलपॅण्ट, शेतकऱ्यांची कर्जमाफी, यासारखे अनेक धडाकेबाज निर्णय घेणारे, पण भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे राजकीय कारकिर्दीवर परिणाम झालेले माजी मुख्यमंत्री बॅ. अब्दुल रेहमान अंतुले यांचा आज जन्मदिवस (दि.९ फेब्रुवारी १९२९)
आपल्या १८ महिन्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत त्यांनी
अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले होते. लातूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांची निर्मिती
आणि कुलाबा जिल्ह्याचे रायगड हे नामांतर त्यांनीच केले होते. पोलिसांना पूर्वी
अध्र्या चड्डीत काम करावे लागे. पोलिसांमध्ये त्याबाबत असणारी संकोचाची भावना
कानावर पडताच साऱ्या पोलिसांसाठी फूल पॅण्ट हा गणवेश त्यांनी जाहीर केला.
कर्जबाजारीपणामुळे अकोला जिल्ह्यात एका शेतकऱ्याने आत्महत्येचा करण्याचा इशारा
दिला असता राज्यातील सर्व
शेतकऱ्यांना त्यांनी कर्ज माफी जाहीर केली होती. बेरोजगारांसाठी ‘संजय गांधी निराधार योजना’ त्यांनीच सुरू केली
होती. कोकणाचा कॅलिफोर्निया करण्याची घोषणा अंतुले यांनी केली होती. कोकणाच्या
विकासासाठी त्यांनी पावले उचलली होती, पण राजीनामा द्यावा
लागल्याने ही कामे मार्गी लागू शकली नाहीत.
राज्यातील प्रस्थापित नेत्यांचा विरोध डावलून अंतुले यांची
इंदिरा गांधी यांनी मुख्यमंत्रीपदी निवड केली होती. तेव्हा सिमेंटची टंचाई निर्माण
झाली असता इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठानला देणग्या दिल्याशिवाय सिमेंट दिले जात
नव्हते. यावरून अंतुले हे ‘जिझिया कर’ जमा करीत असल्याचा आरोप
पक्षांतर्गत विरोधकांनी केला होता. या देणग्या अंतुले यांना महागात पडल्या आणि
त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले. पुढे १७ वर्षांच्या कायदेशीर लढाईत त्यांची
निर्दोष मुक्तता झाली तरी डाग मात्र कायम राहिला.
दि. २ डिसेंबर २०१४ रोजी दीर्घ आजाराने अंतुले यांचे निधन झाले. त्यावेळी राज्य सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला होता.