मोदी चौकीदार नव्हे गैरव्यवहारातील भागीदार
राफेल करार गुप्त नव्हता असे फ्रांसच्या अध्यक्षांनीच स्पष्ट केले
राहुल गांधींची मोदी यांच्यावर घणाघाती टीका
नवी दिल्ली – राफेल भ्रष्टाचार, बेरोजगारांची झालेली फसवणूक, शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसलेली पाने, फसलेली विदेशी निती अशा विविध विषयांवरून कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेतील अविश्वास ठरावावरील चर्चेच्यावेळी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली.
राफेल विमान खरेदीत हजारो कोटी रूपयांचा भ्रष्टाचार मोदी सरकारने केला आहे. हा भ्रष्टाचार दडपण्यासाठी तो करारच गुप्त ठेवण्यात आला. हा करार गुप्त ठेवण्याचा निर्णय फ्रांस आणि भारत सरकारच्या चर्चेत ठरले आहे असे देशाच्या संरक्षण मंत्री सांगत आहेत. पण मी स्वत: फ्रांसच्या अध्यक्षांना भेटून ही बाब त्यांना विचारली असता राफेल विमान खरेदी करार गुप्त नाही त्याचा तपशील तुम्ही माझ्यावतीने भारतवासियांसाठी खुला करू शकता असे खुद्द फ्रांसच्या अध्यक्षांनी मला सांगितले आहे असा गौप्यस्फोट करून राहुल गांधी यांनी सभागृहात खळबळ उडवून दिली.
ते म्हणाले की सत्तेवर आल्यानंतर आपण पंतप्रधान म्हणून नव्हे तर चौकीदार म्हणून काम करू अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली होती. पण पंतप्रधान काहीं मोजक्याच उद्योगपतींसाठी काम करीत आहेत. देशातील काहीं मोजक्या उद्योगपतींची त्यांनी दोन ते अडीच लाख कोटी रूपयांची कर्जे माफ केली आहेत पण त्यांच्याकडे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी मात्र पैसे नाहीत. राफेल करारही एका उद्योगपतीच्या हितासाठीच करण्यात आला आहे. या उद्योगपतीकडे विमान तयार करण्याचा कोणताही अनुभव नाही आणि जो स्वत: 30 हजार कोटींचा कर्ज बाजारी आहे. त्यामुळे मोदी हे चौकीदार नाहीत तर भागीदार आहेत असा आरोप त्यांनी केला.
ते म्हणाले की आम्ही राफेलच्या खरेदीचा करार करताना एका विमानाची किंमत 525 कोटी डॉलर्स इतकी ठरवली होंती. पण एकाएकी काय जादू झाली माहिती नाही पण मोदींनी मात्र आधीचा करार रद्द करून हेच राफेल विमान 1600 कोटी रूपयांना एक या दराने घेतले. जवळपास 45 हजार कोटी रूपयांचा यात गफला झाला आहे. देशाच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी आपण राफेल विमानांच्या किंमतीची माहिती देऊ अशी जाहीर घोषणा केली होती पण नंतर त्यांनी मोदींच्या दबावामुळे घुमजाव केले. भारत आणि फ्रांस यांच्यात गुप्तता करार झाल्याने आता आपण ही किंमत जाहींर करू शकत नाही असे त्यांनी नमूद केले.
दरवर्षी दोन कोटी रोजगार देऊ असे सांगणाऱ्या सरकारने जेमतेम चार लाख युवकांनाच रोजगार दिला आहे अशी सरकारी आकडेवारी सांगते असेही त्यांनी सभागृहाच्या नजरेला आणून दिले. आता सुशिक्षीत युवकांना भजी तळण्यास सांगितले जात आहे असेही त्यांनी सांगितले. देशातील शेतकऱ्यांच्या तोंडालाही सरकारने पाने पुसली असून हमी दर वाढवून देण्याच्या नावाखाली त्यांचीही फसणूक करण्यात आली आहे असे ते म्हणाले. त्यांच्या भाषणात सत्तारूढ भाजप सदस्यांनी अनेकदा अडथळे आणले.
एकदा तर दोन्ही बाजूंनी इतका गदारोळ झाला की कामकाज दहा मिनीटांसाठी तहकुब करावे लागले. जीएसटी, फसलेली विदेश निती यावरूनही राहुल गांधी यांनी मोदींना यावेळी लक्ष्य केले.