महाराष्ट्राचे सुपूत्र मेजर राणे यांना वीरमरण
श्रीनगर – उत्तर काश्मीरमध्ये भारतीय लष्कराच्या सतर्क जवानांनी दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा डाव उधळून लावला. यावेळी झालेल्या चकमकीत लष्कराच्या चार जवानांना वीरमरण आले. त्यात महाराष्ट्राचे सुपूत्र कौस्तुभ राणे यांचा समावेश आहे. दरम्यान, जवानांनी दहशतवाद्यांना जोरदार तडाखा देताना चौघांचा खातमा केला.
सुमारे आठ दहशतवाद्यांच्या गटाने सोमवारी रात्री भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, काश्मीरच्या बांदीपोर जिल्ह्यातील गुरेझ क्षेत्रात तैनात असलेल्या सतर्क लष्करी जवानांनी वेळीच दहशतवाद्यांच्या हालचाली हेरून त्यांना प्रतिकार केला. त्यातून दोन्ही बाजूंमध्ये चकमक झडली. ती सकाळपर्यंत सुरू होती. या चकमकीत मेजर राणे, हवालदार जामी सिंह आणि विक्रमजीत तसेच रायफलमन मनदीप शहीद झाले.
राणे हे ठाणे जिल्ह्यातील रहिवासी होते. त्यांचे कुटूंब मूळचे कोकणातल्या वैभववाडीचे आहेत. दरम्यान, चकमकस्थळी दोन दहशतवाद्यांचे मृतदेह आढळले. त्यांचे आणखी दोन साथीदार मारले गेल्याचे वृत्त आहे. जवानांच्या प्रतिकाराला घाबरून घुसखोरीच्या तयारीत असलेल्या इतर दहशतवाद्यांनी माघारी पाकव्याप्त काश्मीरमध्ये पलायन केले. दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकीची माहिती समजल्यानंतर लष्कराने घटनास्थळी तातडीने आणखी सुरक्षाबळ धाडले.