“मोदींना शेतकऱ्यांचा, तरुणांचा, सरकारी कंपन्यांचा आवाज ऐकण्यात रस नाही”
दिल्ली | महाईन्यूज
मोदी सरकार सध्या सर्वसाधारण अर्थसंकल्पाची तयारी करीत आहेत. सरकारने अर्थसंकल्पासंदर्भात वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांकडून सूचना मागवल्या असून, याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील उद्योगपतींची बैठक घेतली आहे. या बैठकीत त्यांनी अर्थसंकल्पासंदर्भात चर्चाही केली आहे. यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. पंतप्रधान मोदींना शेतकरी, तरुण आणि सरकारी कंपन्यांचा आवाज ऐकण्यात काहीही रस नाही, असं राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण एक फेब्रुवारीला सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहे. अर्थसंकल्पासंदर्भात केंद्र सरकारच्या विविध क्षेत्रातील लोकांसोबत बैठकांचा धडाका सुरू आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अर्थ मंत्रालयाच्या सचिवांची देशातील महत्त्वाच्या उद्योगपतींसोबत बैठक झाली होती.