मोडकळीस आलेली दिघीतील पाण्याची टाकी पाडण्यात यावी
पिंपरी ( महा ई न्यूज ) – दिघी गाव प्रभाग क्र ४ येथील पाण्याची टाकी मोडकळीस आली आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. गेली ४२ वर्ष या टाकीचा कोणत्याही प्रकारचा वापर होत नाही. आता ही टाकी पडण्याच्या मार्गावर आहे. तरी ही टाकी पाडून टाकण्यात यावी, अशी मागणी संतोष वाळके यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिघी गावं येथील सर्वे नं १९ आरक्षण क्र पीजी /२/१३६ खेळाचे ग्राउंडचे आरक्षण आहे. त्याठिकाणी पूर्वी १९७६ दरम्यान पाण्याची टाकी ग्रामपंचायत मार्फत बांधण्यात आली. त्यानंतर आत्तापर्यंत या टाकीचा पाण्याचा वापर कधीही झाला नाही. गाव महापालिकेत समाविष्ट केले आणि नवीन टाकीतून पाणी पुरवठा सुरू झाला. गेली ४२ वर्ष या टाकीचा कोणत्याही प्रकारचा वापर होत नाही. आता ही टाकी पडण्याच्या मार्गावर आहे. आमच्या गावची यात्रा पुढील महिन्यात असून याच मैदानावर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. अशावेळी जर अपघात झाला, तर याला आपणच जबाबदार आहात, असे निवेदनात म्हटले आहे.
मुंबई महानगरपालिका प्रांतिक अधिनियम १९४९ अन्वये प्रकरण १५ कलम २६५ ते २६६ अन्वये असे मोडकळीस आलेले बांधकाम पाडणे महापालिकेचे आद्य कर्तव्य आहे .भविष्यात पुण्यात झालेला अनधिकृत होर्डिंग्ज अपघात सारखा प्रकार घडू नये, यासाठी आपण जबाबदारी घेणे गरजेचे आहे. तातडीने ही मोडकळीस आलेली टाकी पडून टाकणे आपली सर्वस्वी जबाबदारी आहे. भविष्यात घडणाऱ्या घटनेची संपूर्ण जबादारी आपली राहील. तरी आपण तातडीने निर्णय घेऊन ही टाकी पाडण्यात यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.