मेट्रो कारशेड बीकेसीत? राज्याला बुडविण्याचे सल्ले… – फडणवीस
कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम त्वरित थांबवण्यात यावे असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला दिले आहे. ठाकरे सरकारला यामुळे मोठा धक्का बसला आहे. पण यावर ठाकरे सरकार आता मेट्रो कारशेडसाठी आणखी एका पर्यायी जागेचा विचार करत असल्याची चर्चा सुरू आहे.
मेट्रो कारशेड बीकेसी अर्थात बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधल्या बुलेट ट्रेनच्या जागेवर स्थानांतरित करण्याची चाचपणी ठाकरे सरकारने सुरु केली आहे. ठाकरे सरकारकडून बीकेसीमधील बुलेट ट्रेनच्या जागी कारशेड स्थानांतरित करण्याच्या चर्चेनंतर आता यावरून भाजपने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
सरकारला जे कोणी असे सल्ले देत आहे, ते संपूर्ण राज्याला आणि सरकारला बुडविण्याचे सल्ले देत आहेत, असे म्हणत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
वाचाः बोगस ‘एफडीआर’ प्रकरण; नगरसेवकांच्या भागिदारी संस्थाना वाचवण्याचा प्रयत्न
फडणवीस म्हणाले की, बुलेट ट्रेन पूर्णतः भूमिगत म्हणजेच अंडरग्राऊंड स्वरुपाचा प्रकल्प आहे. जमिनीच्या तीन लेव्हल तो खाली आहे. जमिनीवरची फक्त 500 मीटर जागा बुलेट ट्रेनसाठी वापरण्यात येणार आहे. समजा या कारशेडसाठी तितकी जमिन उपलब्ध नसेल आणि त्यामुळे ते भूमिगत करायचे ठरविले, तर 500 कोटींची बांधकामाची किंमत 5 हजार कोटी रूपयांवर जाईल. शिवाय भूमिगत कारशेडच्या देखभालीचा खर्च हा जमिनीवरील कारशेडच्या देखभालीपेक्षा पाच पट अधिक असतो. त्यामुळे हा पर्याय वापरल्यास मेट्रो प्रकल्प कायमस्वरूपी अव्यवहार्य ठरेल.
मोकळ्या जागेचा विचार करायचा झाला, तर एकत्रित 25 हेक्टर जागा एका ठिकाणी उपलब्ध नाही आणि समजा उपलब्ध झालीच तर एमएमआरडीएच्या शेवटच्या व्यवहाराचा दर लक्षात घेता या जागेसाठी २० हजार कोटी रूपये लागतील, असेही फडणवीस म्हणाले.