मुंबई शहराला दोन आयुक्त गरजेचे, अस्लम शेख यांची मागणी
मुंबई – मुंबई शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत जातेय, त्यामुळे मुंबईचा विस्तारही वाढत जातोय. म्हणूनच मुंबई महानगरपालिकेसाठी दोन आयुक्त असणं गरजेचं आहे, अशी मागणी मंत्री अस्लम शेख यांनी नगरविकास विभागाकडे केली आहे. वाढणाऱ्या लोकसंख्येला नागरी सुविधा पुरविण्याची जबाबदारी ही त्या शहरातील महानगरपालिकेची असते. परंतु सध्या महानगरपालिकेसाठी एकच आयुक्त असल्याने नागरीकांचे प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित राहतात, असं अस्लम शेख यांनी म्हटलं आहे.
वाचा :-मुंबई लोकल ट्रेनबाबत राज्य सरकारची मोठी घोषणा; ‘या’ दिवशी सुरू होणार
शिवाय मुंबई उपनगरात राहणाऱ्या नागरिकांना विविध प्रशासकीय कामांसंदर्भात छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील महापालिका मुख्यालयात यावे लागते नागरिकांची होणारी ही गैरसोय पाहता मुंबई शहर व उपनगरासाठी दोन महापालिका आयुक्त असणं गरजेचे आहे. पी-उत्तर वॉर्डच्या विभाजनास राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिल्यानंतर आता पालिकेसाठीही दोन आयुक्तांची मागणी जोर धरू लागली आहे. सध्या मुंबई शहर व उपनगरसाठी दोन जिल्हाधिकारी आहेत. याच पार्श्वभूमीवर दोन आयुक्तांची पदं निर्माण करावीत, अशी मागणी अस्लम शेख यांनी आहे.