मुंबई इंडियन्सचा महत्वाचा निर्णय, RCB च्या फलंदाजावर बोली लावण्याची शक्यता
महाईन्यूज | IPL 2020
आयपीएलच्या आगामी हंगामाचा लिलाव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. १९ डिसेंबरला कोलकाता शहरात हा लिलाव पार पडणार आहे. आगामी हंगामासाठीची Player Transfer Window बंद झालेली असून, एकूण ९७१ खेळाडूंनी या लिलावात सहभाग घेतलेला आहे. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही आगमी लिलावाच्या आधी युवराज सिंह, बेन कटींग, एविन लुईस, जेसन बेहरनडॉर्फ, बरिंदर सरन सह आणखी काही खेळाडूंना करारमुक्त केलं आहे.
गतविजेत्या मुंबई इंडियन्सकडे आगामी हंगामासाठीच्या लिलावाकरता केवळ १३.०५ कोटी रुपयेच शिल्लक राहिलेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई इंडियन्सने RCB चा फलंदाज मिलींद कुमारला Trials साठी बोलावलेलं आहे. सध्या त्रिपुरा संघाकडून खेळणाऱ्या मिलींदने आयपीएलमध्ये बंगळुरु आणि दिल्ली संघांचं प्रतिनिधीत्व केलं आहे. मात्र आतापर्यंत एकाही सामन्यात त्याला संधी मिळालेली नाही. मात्र रणजी क्रिकेटमध्ये केलेल्या आश्वासक कामगिरीनंतर मुंबई इंडियन्सच्या प्रशासनाने मिलींद कुमारवर बोली लावण्याचा विचार केलेला आहे.