मुंबईमध्ये मुसळधार पाऊस
मुंबई – आज सकाळपासून मुंबई आणि परिसरामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सार्वजनिक जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. रस्ते आणि रेल्वेमार्गांवर पाणी साचल्यामुळे वाहतुकीचाही मोठा खोळंबा झाला आहे. त्यातच अंधेरी येथे उड्डाणपूल कोसळल्यामुळे पश्चिम मार्गावरील रेल्वेवाहतुक दिवसभर विस्कळीत झाली होती.
उपनगरांमध्ये दैनंदिन प्रवास करणाऱ्या हजारो चाकरमान्यांना त्यामुळे पर्यायी वाहतुक व्यवस्थेवर विसंबून रहावे लागले. आगामी 24 तासांमध्येही मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
आजच्या पावसामुळे हिंदमाता, सायन, परेल टर्मिनस, नेहरू नगर, कुर्ला, भांडुप, वडाळा, धारावी, अंधेरी आणि मुलुंडसारख्या सखल भागांमध्ये पाणी साचून राहिले होते. महापालिकेच्यावतीने ठिकठिकाणी पंप लावून रस्त्यांवर साचलेले पाणी उपसण्यस सुरुवात झाली आहे. या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाण्याची पातळी वाढली आहे.
खराब हवामानामुळे मुंबई विमानतळावरील काही विमानांचे हवाई मार्गही बदलण्यात आले होते. पण कोणत्याही विमानाचे उड्डाण रद्द झाले नाही. मात्र बहुतेक विमानांचे उड्डाण सरासरी तासभर उशीराने झाले, तर येणारी विमानेही उशीरानेच पोहोचली, असे विमानतळ प्रवक्त्याने सांगितले. वाहतुक कोंडीमुळे विमानतळावर उशीरा पोहोचणाऱ्या प्रवाशांना सामावून घेतले जाईल, असे विस्तरा, गो-एअर आणि जेट एअरवेज या खासगी विमान कंपन्यांनी म्हटले आहे