मुंबईत पावसाने विश्रांती घेतली असून उकाड्याची अनुभूती ; आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता
मुंबईत पडणाऱ्या मुसऴधार पावसाने दोन दिवस झालं विश्रांती घेतली असून लक्ख सुर्यप्रकाश दिसत आहे. त्यामुळे तापमानात वाढ होत असून उकाडा वाढत आहे. दिवसा कमी पाऊस, संध्याकाळी ढगाळ वातावरण होऊन हलका पाऊस बरसत आहे. गेल्या 4-5 दिवसांपासून वातावरणात झालेला हा बदल पुढील काही दिवस कायम राहणार असल्याचे मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक के.एस.होसाळीकर यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे. दरम्यान या वातावरणाचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी मुंबईकरांना केले आहे.
6 सप्टेंबर पासून पावसाचा जोर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागांत वाढण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. तर मुंबई कोरडे वातावरण अनुभवायला मिळेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.यंदा महाराष्ट्रात सर्वत्र चांगला पाऊस झाला. निसर्ग चक्रीवादळानंतर जुलै, ऑगस्ट महिन्यात मुसळधार पावसाने मुंबईसह राज्याला झोडपून काढले. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. परिणामी जनजीवन विस्कळीत झाले. परंतु, धरण, तलाव क्षेत्रात मुबलक पाणीसाठी उपलब्ध झाला. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट टळले आहे.