पवना धरणात 78 टक्के पाणीसाठा; पिंपरी-चिंचवडकरांची पाणी कपात रद्दची मागणी
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहराची तहान भागविणा-या पवना धरणात 77.80 टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. पवना धरण क्षेत्रात झालेल्या दमदार पावसाने पिंपरी-चिंचवडसह मावळच्या नागरिकांना दिलासा दिला आहे. दरम्यान, पिंपरी चिंचवड शहराची एक दिवसाआड पाणी कपात रद्द करावी, अशी मागणी भाजप शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली आहे.
पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणा-या पवना धरणातील पाणी साठ्यात मागील दहा दिवसापासून चांगलीच वाढ झाली आहे. जून आणि 15 जुलैपर्यंत पावसाने काही काळ दडी मारली होती. परंतू, गेल्या दहा दिवसापासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने धरण साठ्यात मोठी वाढ झाली आहे.
पवना धरण परिसरात मागील 1 जूनपासून 1836 मिमि पावसाची नोंद झाली आहे. सध्यस्थितीला पवना धरणात 77.80 टक्के इतका पाणीसाठा आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. धरणाच्या पाणीसाठ्यात वाढलेल्या पाण्यामुळे पिंपरी-चिंचवडसह मावळच्या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीचा प्रश्न मिटणार आहे.
तसेच पिंपरी चिंचवड शहरात मागील दोन महिन्यापासून एक दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. जूलै महिन्याअखेर पाणी पुरवठा पुरवावा, म्हणून पाणी कपात करण्यात आली होती. सध्यस्थितीत धरणाच्या पाणी साठ्यात चांगली वाढ झाल्याने पिंपरी-चिंचवडकरांची पाणी कपात रद्द करावी, अशी मागणी होवू लागली आहे.