“मुंबईत काल एक प्रकारचं वादळच आलं होत,एवढ्या पावसानं मुंबईच काय जगातील कोणतंही शहर तुंबणारच”-पालिका आयुक्तांचा दावा
मुंबईत काल पासून ३०० मिमी विक्रमी पाऊस पडलाय आजही पावसाची रिपरिप सुरुच आहे. गेल्या ३० वर्षात मुंबईत असा पाऊस कधीच पाहिला नसल्याच मुंबई महापालिकेचे पालिका आयुक्त आय. एस. चहल यांनी म्हटलं. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने मुंबईच काय जगातील कोणतंही शहर तुंबणारच, काल मुंबईतील काही भागांत एकप्रकारचे वादळच आलं होतं असं मत व्यक्त करत त्यांनी काही ठिकाणांची पहाणीही केली.
पेडर रोडवरील हँगिग गार्डनजवळ आज भिंत खचून सुमारे ५० वृक्ष उन्मळून पडले. त्याची पाहणी करण्यासाठी पालिका आयुक्त आय. एस. चहल आले होते. या पाहणीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. मुंबईत काल ताशी १०१ किलोमीटरच्या वेगाने वारे वाहत होते. हे एक प्रकारचं वादळच होतं. पण संपूर्ण मुंबईत हे वादळ नव्हतं. दक्षिण मुंबईतच त्याचा प्रभाव होता. वादळ दोन प्रकारचे असतात कालचे वादळ हे त्यापैकी एक होते, असही चहल म्हणाले. काल कुलाबा ते नरिमन पॉइंट परिसरात विक्रमी पाऊस झाला. मुंबईत चार तासांत ३०० मिमी पाऊस पडला. मी ३० वर्षांपासून मुंबईत आहे. पण असा पाऊस कधीच पाहिला नाही. २६ जुलैलाही मी मुंबईत होतो. पण त्यावेळीही असा पाऊस कधीच पाहिला नव्हता, असही ते म्हणाले.
आज सलग तिसऱ्या दिवशीही पावसाचा जोर मुंबईत कायमचआहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलंय. रस्त्यावर आणि रेल्वेरुळावर पाणी साचल्याने अनेक लोक अडकून पडले होते. रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधून दोघांच्या समन्वयाने अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. पालिकेने या लोकांच्या राहण्याची पालिकेच्या शाळेत व्यवस्था केली होती. त्यांना पालिकेकडून भोजनही देण्यात आलं. आता मुंबईतील पाणी काही प्रमाणात ओसरलंआहे. त्यामुळे वाहतूक सुरू झालीये. हिंदमाता परिसरातही पाणी तुंबलेलं नाही. काल जेजे रुग्णालयात संध्याकाळी ७ वाजता पाणी भरलं होतं. संध्याकाळी १० वाजेपर्यंत मुंबई पालिकेनं पाण्याचा निचरा केला.
यावेळी चहल यांनी मेट्रोला क्लिनचिट दिली. साधारणपणे ६५ मिमी पाऊस पडला तरी अतिवृष्टी झाली असं मानलं जातं. इथं तर ३०० मिमी पाऊस पडला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यावर मुंबईच काय जगातली कोणतंही शहर तुंबणारच, असं सांगतानाच साधारण पाऊस पडून पाणी तुंबले असते तर मेट्रोच्या कामांमुळे मुंबई तुंबल्याचं आपण बोलू शकलो असतो. पण विक्रमी पाऊस पडल्याने मेट्रोवर खापर फोडता येणार नाही, असं सांगत त्यांनी मेट्रोला क्लिनचिट दिली.