‘मिनिमम बॅलन्स’बद्दल स्टेट बँकेचा मोठा निर्णय
नवी दिल्ली | भारतीय स्टेट बँकेने बुधवारी मोठा निर्णय घेतला आहे. एसबीआयनं सर्व बचत खात्यांसाठी दरमहा किमान शिल्लक रकमेची अट काढून टाकली आहे. त्यामुळे बँकेच्या 44 कोटींहून अधिक ग्राहकांना याचा फायदा पोहोचणार आहे. यासंदर्भात स्टेट बँकेनं निवेदन जारी केले आहे. आता बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम ठेवण्याचे कोणतेही बंधन ग्राहकांवर नसेल.
बँकेने ही जाचक अट आता काढून टाकल्यानं त्याचा ग्राहकांना फायदा पोहोचणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच भारतीय स्टेट बँकेत तिच्या पाच संलग्न बँका तसेच भारतीय महिला बँक विलीन करण्यात आल्या आहेत. त्या बँकांनाही हे नियम लागू झाले आहेत.
तसेच एसबीआयच्या या निर्णयामुळे खातेदारांना बचत खात्यात किमान सरासरी शिल्लक रक्कम ठेवण्याची आवश्यकता नाही. तसेच बचत खात्यात दरमहा किमान शिल्लक रक्कम नसल्यावरही बँक कोणताही दंड वसूल करणार नसून याचा 44 कोटी 51 लाख बचत खातेदारांना फायदा पोहोचणार आहे. सध्या ‘एसबीआय’मध्ये ग्राहकांना ठरावीक नेमून दिलेली रक्कम बचत खात्यात ठेवावी लागते.
खात्यात किमान शिल्लकीच्या कमी रक्कम झाल्यास त्यावर बँक 5 ते 15 रुपये दंड कराच्या स्वरूपात वसूल केले जातात. या निर्णयापूर्वी शहरांसाठी 3000 रुपये, निमशहरी भागातील खातेदारांसाठी 2000 रुपये आणि ग्रामीण भागात दरमहा सरासरी 1000 रुपयांची शिल्लक ठेवण्याची अट होती. मात्र आता ती अट आता शिथिल करण्यात आली आहे.