मित्रपक्षाच्या हट्टामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट – सुधीर मुनगंटीवार
मुंबई : भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना वेळेत सत्तास्थापना करण्यात अपयश आल्याने अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. याचं खापर आता एकमेकांवर फोडण्यास सुरुवात झाली आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी यावरुन शिवसेनेवर आरोप केले आहेत. शेतकरी संकटात आहे, राज्यात अनेक समस्या आहेत. अशात काही राजकीय पक्षांनी जनादेशाचा अनादर केल्यामुळं राष्ट्रपती राजवट लागू झाली असल्याचे ते म्हणाले.
राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्तास्थापनेसाठी पाचारण केले. मात्र, भाजपने सत्तास्थापनेचा दावा करण्यास असमर्थता व्यक्त केली. त्यानंतर, दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिवसेनेला पाचारण करण्यात आले. त्यांनी दिलेल्या मुदतीत दावा केला असला तरी तो पर्याप्त संख्याबळाच्या आधारे करण्यात आलेला नाही. शिवसेनेने त्यासाठी राज्यपालांकडे अधिक वेळ मागितला. मात्र, तो नाकारण्यात आला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला पाचारण करण्यात आले. राष्ट्रवादीने देखील सत्तास्थापनेसाठी मुदतवाढ मागितली. मात्र, त्यांनाही ती नाकारण्यात आली. त्यामुळं अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली.