breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र
मावळ गोळीबार : विरोधकांकडे माझे संभाषण असेल, तर मी राजकारणातून सन्यास घेईल
पुणे – लोकसभेच्या मावळ मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्यावर निशाना साधत मावळ गोळीबाराचे भांडवल विरोधकांकडून केले जात आहे. त्यावर माजी उपमुख्यमंत्री आणि पार्थ पवार यांचे वडिल अजित पवार यांनी मावळ गोळीबारासंदर्भात स्पष्टीकरण केले आहे. मावळ गोळीबारासंदर्भात विरोधकांकडे माझे संभाषण असल्यास राजकारणातून निवृत्ती घेईल, असे खळबळजणक विधान अजित पवार यांनी पुण्यात केले आहे. पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये आघाडीच्या संयुक्त बैठकीनंतर माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारला होता.
मावळ गोळीबाराच्या संदर्भात भाजपने केलेल्या आरोपांचा समाचार घेताना ते म्हणाले की, देशाचे पंतप्रधान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात सध्या पोलीस यंत्रणा आहे. त्यात सीआयडी, सीबीआय सगळ्यांचा समावेश होतो. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. जीवात जीव असेपर्यंत शेतकऱ्यांच्या विरोधात कोणतेही काम माझ्याकडून होणार नाही. मावळच्या गोळीबाराच्या संदर्भात माझे प्रशासनाशी कोणतेही संभाषण विरोधकांकडे असेल, तर अजित पवार राजकारणातून निवृत्त होईल. माझ्यावर हे बिनबुडाचे आरोप सातत्याने होत आहेत. जे आरोप करत आहेत, त्यांनीही त्यांची राजकीय कारकीर्द पणाला लावून चौकशी अहवाल जनतेसमोर ठेवून “हा सूर्य हा जयद्रथ” म्हणून विरोधकांना खुले आव्हान दिले.
पुण्याचा काॅंग्रेसचा उमेदवार काल रात्री उशीरा जाहीर करण्यात आला. आज काॅंग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर मित्र पक्षांची काॅंग्रेसभवनात बैठक पार पडली. या बैठकीत प्रचाराची रणनिती आखण्यात आली. यावेळी विराेधकांकडून सातत्याने मावळच्या घटनेचा उल्लेख केला जात असल्याने त्यांनी विराेधकांचा चांगलाच समाचार घेतला. तसेच, माझ्यावरील आराेप खरे ठरले तर राजकारणातून निवृत्त हाेईल, असे वक्तव्य देखील त्यांनी यावेळी केले.