खाकीतल्या दरोडेखोरांची उदगीरमध्ये दहशत; व्यावसायीकांत भीतीचे सावट
- सराफी व्यावसायिकाचे दीड लाख केले लंपास
- चार पोलीस कर्मचा-यांवर उच्चस्तरीय कारवाई
उदगीर, (प्रतिनिधी)- आदर्श आचारसंहिता आणि लोकसभा निवडणुकीचा माहोल असल्याचा गैरफायदा घेऊन सराफी दुकानदाराला रस्त्यात अडवून त्याला पोलीस ठाण्यात डांबून ठेवले. त्याची पैशाची बॅग घेऊन त्यातील दीड लाख रुपये गायब केल्याचा धक्कादायक प्रकार आल्याने उदगीरमधील चार पोलीस कर्मचा-यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. पोलीस अधिक्षक राजेंद्र माने यांनी स्वतः दखल घेतल्याने या प्रकरणाने महाराष्ट्र पोलीस दलाला धक्का बसला आहे.
याप्रकरणी सचिन बालाजी चन्नावार यांनी फिर्याद दिली आहे. अधिक्षक राजेंद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली आतिरीक्त पोलिस अधिक्षक, उपविभागीय पोलिस अधिका-यांनी मंगळवारी (दि. १) लुटमार केल्याचे गुन्हे दाखल केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निवडणूक विभागात रमेश बिरले आणि शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेत हरी डावरगावे, महेश खेळगे, शाम बडे कार्यरत आहेत. शुक्रवारी (दि. २९) रात्री साडेदहाच्या सुमारास सोन्याचे व्यापारी सचिन चन्नावार आपले दुकान बंद करुन दागीने आणि रोख सहा लाख रुपये बॅगेत घेऊन घराकडे जात होते. शिवाजी चौकात त्यांची गाडी अडवून पोलिसांनी त्यांच्याकडे विचारणा केली. त्यांची पिशवी घेऊन पोलीस ठाण्यात त्यांना घेऊन गेले. त्यांना चार तास बसवून ठेवले. नंतर चन्नावार यांना चार लाख रुपये रोख रक्कम आणि सोन्याचांदीचे दागिने परत केले. मात्र, बॅगमधील दीड लाख पोलिसांनी लंपास केले.
याप्रकरणी अनेकांनी मध्यस्थी करुन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, फिर्यादी चन्नार यांनी पोलिसांच्या विरोधात पोलिस महानिरिक्षक नांदेड, निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी लातूर, पोलिस अधीक्षक लातूर व सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी उदगीर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार दिली. त्यानंतर १ एप्रिल २०१५ रोजी पोलिस अधिक्षक राजेंद्र माने, अप्पर पोलिस अधीक्षक हिम्मतराव जाधव यांनी उदगीर येथे उपस्थित राहून रमेश बिरले, हरी डाबरगावे, महेश खेळगे व शाम बडे यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी भीमाशंकर हिरमुखे करीत आहेत.