मार्केट यार्ड 31 मार्चपर्यंत बंद राहणार
पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारपासून (दि. 25) 31 मार्चपर्यंत मार्केट यार्ड बंद ठेवण्याच्या निर्णयावर आडते, कामगार आणि हमाल ठाम आहेत. तर, मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने काम करता येणे शक्य नसल्याची भूमिका दि पुना मर्चंट्स चेंबरने घेतली आहे.
मंगळवारी झालेल्या बैठकीत याबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे शहरात अन्नधान्य आणि भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, बाजार सुरू करण्याच्या दृष्टीने बाजार समितीकडून पाऊले उचलण्यात येत आहेत. वरिष्ठ आणि बाजार समितीच्या कर्मचाऱ्याशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे बाजार समितीचे प्रशासक बी.जे.देशमुख यांनी सांगितले.
श्री छत्रपती शिवाजी महाराज आडते असोसिएशने फळ, भाजीपाला विभाग, तर, दि पुना मर्चंट्स चेंबरने भुसार विभाग बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. कामगार आणि हमाल यांनीही काम बंद केले आहे. शहरात अन्नधान्य आणि भाजीचा तुटवडा होऊ नये, यासाठी बाजार सुरू रहावेत, असे सरकारकडून बोलले जात आहेत. या दृष्टीने बाजार समितीने मंगळवारी बैठक बोलविली. मात्र, ही बैठक निष्पळ ठरली.
आडते आपल्या बंदच्या निर्णयावर ठाम असल्याचे आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी सांगितले. तर, कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नेहमीच्या तुलनेत कमी कामगार कामाला येत असून, घरचे कामगारांना कामावर पाठवत नसल्याचे कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे यांनी सांगितले. तर, दि पुना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल म्हणाले, भुसार बाजार सुरू ठेवण्याबाबत व्यापारी सकारात्मक आहेत. मात्र, काम करण्यासाठी हमाल आणि दिवाणजी उपलब्ध नाहीत. त्यामुळे बाजार सुरू ठेवणे अवघड आहे. हमाल आणि दिवाणजी उपलब्ध करून दिल्यास काम सुरू करण्यात येईल.