मनपा प्रशासन, पोलीस, व्यापारी, नागरिक यांनी सामंजस्याने काम करावे : खा. श्रीरंग बारणे
मनपा प्रशासन, पोलीस, व्यापारी, नागरिक यांनी सामंजस्याने काम करावे : खा. श्रीरंग बारणे
पिंपरीतील सिंधी नागरिकांना लवकरच सनद मिळणार : खा. श्रीरंग बारणे
पिंपरी । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
पुणे दिवाळीमुळे पिंपरी कॅम्प व परिसरात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे वाहतूक समस्याने उग्ररूप धारण केले आहे. या भागातील वाहतूक समस्या, अतिक्रमण याबाबत मनपा प्रशासन, पोलीस, व्यापारी, नागरिक यांनी सामंजस्याने काम करावे. व्यापाऱ्यांना, फेरीवाले व नागरिकांना त्रास होईल अशी भूमिका पोलीस प्रशासनाने व मनपा प्रशासनाने घेऊ नये तसेच पिंपरी कॅम्प मधील सिंधी बांधवांना सनद देण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे असे प्रतिपादन खासदार श्रीरंग बारणे यांनी केले.
पिंपरी कॅम्प व परिसरातील व्यापाऱ्यांची संघटना असणाऱ्या पिंपरी मर्चंट फेडरेशनच्या वतीने मंगळवारी खा. श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत पिंपरी मधील बी. टी. आडवाणी धर्मशाळा येथे आयोजित केलेल्या बैठकीत खा. बारणे बोलत होते.
यावेळी पिंपरी मर्चंट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवानी, माजी उपमहापौर डब्बू आसवानी, व्यापारी प्रतिनिधी हरेश आसवानी, महेश मोटवानी, मनपा अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, पोलीस उपायुक्त मंचक ईप्पर, आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त सागर कवडे, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, भूमी जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी, कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, अर्जुन पवार, फेरीवाला संघटनेचे बाबा कांबळे आणि पिंपरी कॅम्प मधील बहुसंख्य व्यापारी उपस्थित होते.
यावेळी खा. बारणे यांनी सांगितले की, मागील दोन वर्षा पासून कोरोनामुळे व्यापारी पेठा बंद होत्या. यावर्षी दिवाळी पूर्व खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी होत आहे. या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन, नागरिक, व्यापारी, पोलीस यांनी एकत्रितपणे काम करावे. सर्वांनी नियमांचे पालन करावे. पोलीस प्रशासन व मनपा प्रशासनाने व्यक्तिगत कारवाई करू नये. वाहतूक समस्या विषयी, कॉपीराईट, अतिक्रमण, पार्किंग व्यवस्था, प्लास्टिक बंदी विषयी ज्या समस्या आहेत. त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल. महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह हे शहराच्या विकासाबाबत व विकास आराखड्याबाबत बाबत सकारात्मक आहेत. शहर वाढत आहे तसे व्यापाऱ्यांची संख्या वाढत आहे. पिंपरी कॅम्प परिसरात असलेल्या पार्किंग जागेत नागरिकांनी वाहने पार्क करावीत. सर्वांनी शासकीय नियमांचे पालन करावे असे आवाहन खा. बारणे यांनी यावेळी केले.
यावेळी पिंपरी मर्चंट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवानी यांनी मागणी केली की, पिंपरी कॅम्प परिसर दाट लोकवस्तीचा परिसर झाला आहे. हा भाग गावठाण म्हणून घोषित करावा. बाजारपेठ मध्ये पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवावे. पोलीस व मनपा प्रशासनाने फुटपाथ वरील अतिक्रमण काढून घ्यावे. दुकानांसमोर पथारी वाले आणि फेरीवाले यांचे अतिक्रमण वाढत असून ते व्यापाऱ्यांवर दादागिरी करीत आहेत. याबाबत पोलिसांनी लक्ष घालावे. व्यापाऱ्यांना चौकशीच्या नावाखाली त्रास देऊ नये. कॉपीराईटच्या नावाखाली धाडी टाकून व्यापाऱ्यांना त्रास दिला जात आहे. हे ताबडतोब थांबले पाहिजे.
यावेळी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, पोलीस उपायुक्त मंचक ईप्पर, फेरीवाल्यांचे नेते बाबा कांबळे यांनी देखील मार्गदर्शन केले.