माझ्या लग्नात ५००० अनोळखी लोकं- कपिल शर्मा
बॉलिवूडमधील दीपिका-रणवीर, निक-प्रियांका या प्रसिद्ध जोडप्यानंतर विनोदवीर कपिल शर्मा देखील बोहल्यावर चढला. कपिल शर्माने गर्लफ्रेंड गिन्नीसह गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लग्न केले. त्याच्या लग्नातील काही आठवणींना ‘कपिल शर्मा शो’मध्ये उजाळा दिला आहे. कपिलने त्याच्या लग्नातील असे काही किस्से शेअर केले आहेत की ते ऐकून चाहत्यांना हसू आवरत नाही.
‘कपिल शर्मा शो’मध्ये नुकताच भारताची फुलराणी सायना नेहवाल आणि बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप यांना पाहुणे म्हणून बोलवण्यात आले होते. कपिलच्या विनोदाचा मनमुराद आनंद लुटत या दोघांनी त्यांच्या करिअर आणि खासगी आयुष्यातील बऱ्याच गोष्टी मोकळेपणाने सांगितल्या. त्यात कपिलने देखिल त्याच्या लग्नातील किस्से सांगितले आहेत.
‘माझ्या लग्नाला जवळपास ५००० लोकांनी हजेरी लावली होती. पण जेव्हा मी आजूबाजूला पाहिले तेव्हा त्यातील मोजून ४० ते ५० लोकांना मी ओळखत होतो’ असे कपिल शर्मा म्हणाला. कपिलचे हे वक्तव्य ऐकताच चाहत्यांमध्ये हास्याची लाट पसरली होती. पुढे कपिल म्हणतो की, ‘तुम्हाला माहित आहे का? सायना आणि कश्यप यांच्या लग्नात मोजून ४० पाहुणे हजर होते. विराट-अनुष्काच्या लग्नातही ४० लोकांना आमंत्रण देण्यात आले होते. तसेच दीपिका आणि रणवीरच्या लग्नात देखील फक्त ४० पाहुणे उपस्थित होते. हिच ती ४० लोक या तिन्ही लग्नाला उपस्थित होती का असा मोठा प्रश्न मला पडला आहे.’ त्याच्या या वक्तव्यानंतर प्रेक्षकांमध्ये हस्याची लाटच पसरली.
कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथ हे १२ डिसेंबर २०१८ रोजी लग्न बंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्न सोहळ्याला फक्त जवळच्या लोकांना आमंत्रण देण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी अमृतसर येथे रिसेप्शन आयोजित केले होते.