माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास, सत्यमेव जयते, रिया चक्रवर्तीची पहिली प्रतिक्रिया समोर
मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला ४० दिवसांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. त्याने आत्महत्या का केली आहे याचाच कसून शोध सध्या पोलीस घेत आहेत. याप्रकरणी आतापर्यंत ४० जणांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत. दरम्यान सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल केल्यामुळे आता या प्रकरणाला आणखी एक वळण लागलेले आहे. आता याप्रकरणाची चौकशी बिहार पोलीस देखील करत आहेत. महत्त्वाचं म्हणजे याप्रकरणी खुद्द अभिनेत्री रिया चक्रवर्तीने प्रतिक्रिया दिलेली आहे.
ती म्हणाली, ‘मला विश्वास आहे की मला न्याय नक्कीच मिळेल. भले माझ्या विरोधात सध्या प्रसार माध्यमांमध्ये अनेक वाईट बातम्या प्रसारित होत आहेत. माझ्या वकिलांच्या सल्ल्याप्रमाणे मी त्यावर कोणताही खुलासा करणार नाहीये. सत्यमेव जयते… अखेर सत्याचा विजय होईल..’ असं म्हणतं तिने तिच्यावर होत असलेले सर्व आरोप फेटाळलेले आहेत.
दरम्यान, सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणामध्ये आता ईडीनेही कारवाई केली आहे. ईडीने रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. ईडीच्या कारवाईनंतर रियाने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पाटण्यामधील राजीव नगर पोलीस स्थानकात सुशांतच्या वडिलांनी त्याची प्रेयसी, अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्याविरोधात एक तक्रार दाखल केली होती. सुशांतच्या वडिलांनी तक्रार दाखल केल्यामुळं आता या प्रकरणाला आणखी एक वळण लागलेले आहे.