महिला सुरक्षिततेवरून चित्रा वाघ यांचा महाविकासआघाडीवर निशाणा, म्हणाले…
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे एका 60 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे अपमान सहन न झाल्याने पीडित महिलेने तलावात उडी घेत आत्महत्या केली आहे. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. महाविकास आघाडी सरकार बलात्काऱ्यांना शक्ती देत असल्याचा गंभीर आरोप भाजपाच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी केलाय. या घटनेवरुन टीका केलीय. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी या घटनेची दखल घेत आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन राज्य सरकारवर गंभीर आरोप केलाय.
राज्यात बलात्काऱ्यांना ”शक्ती” देण्याचं काम सरकार करतयं, ज्यामुळे या विकृतांचे मनोबल वाढलेलं दिसतयं. तक्रार आल्यावर लगेच मुसक्या आवळल्या गेल्या पाहिजेत, ना कि तपास व चौकशीच्या नावाखाली अभय, असे ट्विटर चित्रा वाघ यांनी केलंय. तसेच, रायगडमधील 8 वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेवरुनही सरकारला धारेवर धरलंय. समाजात विकृती फोफावतीये पण तिला जेरबंद करायला शासन कमी पडतयं हे नक्की, कायदे आणतयं पण त्याची प्रभावी अंमलबजावणी करतांना मात्र विकृतांना पाठीशी घालायची शासनाची भूमिका असल्याचा गंभीर आरोपही वाघ यांनी केलाय.
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लातूरमधील पीडितेचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. नराधमाला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी पीडित महिलेच्या कुटुंबियांनी केली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.