महिला दिनाच्या निमित्ताने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उचलले महिलांसाठी महत्त्वाचं पाऊलं
मुंबई | महाईऩ्यूज |
राज्यातील पोलिस दलामध्ये महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रमाण सध्याच्या १५ टक्क्यांहून ३० टक्क्यांपर्यंत नेण्याच्या दृष्टीने राज्य शासन प्रयत्नशील राहील, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी सांगितले. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत महिला सुरक्षा पदयात्रा काढण्यात आली.
मुंबई पोलिस दलातील महिला पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच विविध शाळांच्या विद्यार्थिनी, आरएसपीच्या विद्यार्थिनी, विद्यार्थी या पदयात्रेत सहभागी झाले. एनसीपीए येथे या पदयात्रेच्या शुभारंभप्रसंगी अनिल देशमुख बोलत होते. यावेळी मुंबई पोलिस दलातील अनेक वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.
अनिल देशमुख म्हणाले, आज महिलांच्या गौरवाचा दिवस आहे. एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या त्या सक्षमतेने सांभाळत आहेत. घर आणि कुटूंब सांभाळून विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिला आदर्शवत काम करत आहेत.
राज्याच्या पोलिस दलात सुमारे सव्वादोन लाख अधिकारी, कर्मचारी आहेत. त्यापैकी सुमारे २८ हजार म्हणजेच १५ टक्क्यांच्या आसपास महिला आहेत. सुरक्षा व्यवस्थेमध्ये त्या उत्कृष्ट काम बजावत आहेत. महिला पोलिसांचे प्रमाणे वाढवून ३० टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी शासनाचा प्रयत्न राहील.
ते पुढे म्हणाले, समाजात घडणाऱ्या महिलांवरील अत्याचाराच्या घटना दुर्दैवी आहेत. राज्य शासन या बाबतीत अत्यंत संवेदनशील असून अशा दुर्दैवी घटनांना पायबंद घालण्यासाठी नवीन कायदा करत आहे.