‘महाविकास आघाडीचा मोठा नेता संपर्कात; महाराष्ट्रातही लवकरच बंडखोरी’- आठवले
मुंबई | महाईन्यूज
गेल्या काही महिन्यांपासून नाराज असलेले काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्ष सदस्यत्वाच राजीनामा दिल्याने मध्य प्रदेशात मोठा राजकीय भूकंप आला आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी हा मोठा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच आता मध्य प्रदेशमधील पडसाद महाराष्ट्रात देखील उमटणार असल्याचे मोठं विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
रामदास आठवले म्हणाले की, ज्योतिरादित्य शिंदे हे मुळचे महाराष्ट्राचे असून मराठी भाषिक आहे. तसेच ज्योतिरादित्य शिंदे यांची आजी देखील याआधी भाजपा पक्षात होती. त्यामुळे ज्योतिरादित्या शिंदे यांनी भाजपात प्रवेश करुन घरवापसी केली आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपावर टीका करण्यात येत आहे. मात्र भाजपाने कोणत्याच प्रकारची फोडाफोडी केली नसल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले आहे. मध्य प्रदेशात झालेल्या मोठ्या राजकीय भूकंपाचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटतील असं रामदास आठवले यांनी सांगितले. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपासोबत आल्यास राज्यात मजबूत सरकार अस्तित्वात येईल. तसेच असं काही न घडल्यास लवकरच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिनही पक्षात बंडखोरी होईल असा दावा रामदास आठवले यांनी केला आहे. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीचा एक मोठा नेता आमच्या संपर्कात असल्याचा मोठा खुलासा देखील रामदास आठवले यांनी यावेळी केला.