महालक्ष्मी एक्सप्रेस प्रवाशांसाठी 19 डब्यांची विशेष गाडी कल्याणहून सुटणार
- कोल्हापूरचे प्रवाशांना पुण्यामार्गे रवाना होणार
मुंबई – ‘महालक्ष्मी एक्स्प्रेस’च्या प्रवाशांसाठी 19 डब्यांची विशेष गाडी कल्याणहून कोल्हापूरसाठी सोडण्यात येईल, अशी घोषणा रेल्वे प्रशासनाने केली आहे. कल्याणहून कसारा, इगतपुरी मनमाड, पुणेमार्गे ही विशेष गाडी कोल्हापूरला रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महालक्ष्मी एक्स्प्रेस जास्त पावसामुळे खोळंबली. उल्हास नदी ओव्हरफ्लो झाल्यामुळे ही समस्या उद्धभवली. नेव्ही, एनडीआरएफ, पोलीस आणि सर्व यंत्रणा रात्रीपासून काम करत होत्या. एक हजार पन्नास लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आल आहे. प्रवाशांच्या जेवणाची सुविधा एका ठिकाणी केली आहे. त्या ठिकाणी सर्व प्रवाशांना पाठवण्यात आले आहे. कल्याण ते कोल्हापूर स्पेशल ट्रेन सोडण्यात येणार आहे. 14 तासानंतर ट्रेनमधील सर्व बचावकार्य संपले आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली आहे.
मुसळधार पावसामुळे बदलापूर-वांगणी रेल्वे स्थानकादरम्यान कोल्हापूरकडे जाणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली होती. या ट्रेनमध्ये अडकलेल्या 600 प्रवाशांची अखेर 17 तासांनंतर सुखरूप सुटका करण्यात आली आहे. रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली होती. जवळपास 2000 प्रवासी एक्स्प्रेसमध्ये अडकल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर तब्बल 17 तासांच्या थरारानंतर NDRF च्या पथकाने सर्व प्रवाशांची सुटका केली आहे. आता या प्रवाशांसाठी 19 डब्यांची विशेष गाडी कल्याणहून कोल्हापूरसाठी सोडण्यात येणार आहे.
NDRFकडून सर्व प्रवाशांची सुखरुप सुटका
पावसामुळे मदतकार्यात अडथळा निर्माण येत होता. पण एनडीआरएफच्या टीमने अथक परिश्रम केल्याने सर्व प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. त्यांच्या जेवणाची आणि वैद्यकीय तपासणीची व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे. तसंच या प्रवाशांना बदलापूरला नेऊन त्यांना मनमाडमार्गे कोल्हापूरला पाठवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.
मुंबईतून 50 जणांच्या पथकाने एकूण 6 बोटीच्या मदताने बचावकार्यात सहभाग घेतला होता. पुण्यातून 40 जणांचे पथकही 5 बोटींसह बचावकार्य करण्यासाठी बदलापूरमध्ये झाले आहे. अडकलेल्या प्रवासी आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीसाठी नौदल आणि एनडीआरएफ टीम प्रमुख यांना राज्य सरकारने मदतीसाठी संपर्क केला. हेलिकॉप्टर तसेच इतर सुविधा द्यावी, अशी मागणी केली होती. प्रवाशांना वाचवण्यासाठी नेव्हीचे सी किंग हेलीकॉप्टर घटनास्थळी पोहोचले होते. सलग 17 तासांच्या अथक परिश्रमानंतर सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली.