महत्वपूर्ण लढतीत मुंबईचा निर्णायक विजय…
- आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धा
मुंबई – अँड्रयू टायच्या प्रभावी माऱ्यासमोर मुंबईच्या वरच्या फळीची दाणादाण उडाली. तरीही कायरॉन पोलार्ड व कृणाल पांड्या यांच्या झंझावाती भागीदारीमुळे आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेतील 50 व्या साखळी सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला किंग्ज इलेव्हन पंजाब संघासमोर विजयासाठी 187 धावांचे आव्हान ठेवता आले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबच्या संघाने 20 षटकामध्ये 183 धावा बनविल्या. अशाप्रकारे मुंबईचा संघ 3 धावांनी विजयी झाला. पंजाबच्या लोकेश राहुलची दमदार 94 धावांची खेळी व्यर्थ गेली. तो निर्णायक क्षणी बाद झाला. त्याने 60 चेंडूंत 10 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 94 धावांची खेळी केली.
नाणेफेक गमावून पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने निर्धारित 20 षटकांत 8 बाद 186 धावांची मजल मारली. पंजाबकडून अँड्रयू टायने 16 धावांत 4 बळी घेतले होते.
संघात पुनरागमन करीत पोलार्डने मुंबई इंडियन्स मधील आपली निवड योग्य असल्याचे दाखवून दिले. पोलार्डने 23 चेंडूंत 5 चौकार आणि 3 षटकारांच्या जोरावर 50 धावा केल्या. त्याने मुंबईच्या विजयात महत्वाचे योगदान दिलेले आहे.