मला सल्ला देणाऱ्या मोदींनी आता बोलावं; मनमोहन सिंग यांचा टोला
नवी दिल्ली: कठुआ, उन्नाव बलात्कार प्रकरण आणि चलन तुटवडा आदी प्रकरणांवर मौन धारण करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जोरदार हल्ला चढविला आहे. ‘मौन राहिल्याने कधीकाळी मला मौनी मनमोहन सिंग हिणवत बोलण्याचा सल्ला मोदींनी दिला होता. मोदींनी आता स्वत:च्या सल्ल्याची आठवण करून त्यावर अंमलबजावणी करावी. त्यांनी काहीतरी बोलावं,’ अशी बोचरी टीका मनमोहन सिंग यांनी केली आहे.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मनमोहन सिंग यांनी ही बोचरी टीका केली. देशातील विविध घटनांवर मोदी मौन धारण करून असल्याने मनमोहन सिंग यांनी मोदींना धारेवर धरले आहे. ‘बराच काळ मौन साधल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाच्या कार्यक्रमात मोदींनी मौन सोडलं. ते काही तरी बोलले. याचं मला समाधान वाटत,’ असा टोला मनमोहन सिंग यांनी मोदींना हाणला.
‘मोदी मला नेहमीच बोलण्याचा सल्ला देत होते. आता त्यांनी त्याची अंमलबजावणी करावी. त्यांनी वारंवार बोलत राहिलं पाहिजे,’ असं सांगतानाच ‘दिल्लीत २०१२ मध्ये निर्भया बलात्काराची घटना घडली होती. त्यानंतर आमच्या सरकारने बलात्काराच्या कायद्यात बदल करून हा कायदा आणखी कठोर केला,’ असं ते म्हणाले.
कठुआ प्रकरणाला मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी गंभीरपणे हाताळायला हवं होतं. त्यांनी सुरुवातीपासूनच हे प्रकरण स्वत: हाताळायला हवं होतं, असं सांगतानाच कदाचित त्यांच्यावर मित्रपक्ष भाजपचा दबाव असेल. भाजपच्या दोन मंत्र्यांनीच बलात्काराचं समर्थन केल्यानंतर हा दबाव वाढला असेल, अशी टीकाही त्यांनी केली. कायदा-सुव्यवस्था, महिलांची सुरक्षा, मुस्लिमांची हत्या आणि दलित अत्याचारावर हे सरकार काहीच करताना दिसत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.