मराठी क्रांती मोर्चा आक्रमक :मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणी, मराठा आरक्षणाचा निकाल विरोधात गेला तर आंदोलनाचा इशारा
पुणे । ‘सारथी संस्था आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा क्रांती मोर्च्याने राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘उद्या मराठा आरक्षणाची सुनावणी आहे. निकाल विरोधात गेला तर 9 ऑगस्टपासून मराठा क्रांती मोर्चा कोरोना लॉकडाऊनचे निर्बंध पाळून रस्त्यावर उतरेल,’ असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.
तसेच, सारथी संस्थेवरुन राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या मराठा क्रांती मोर्चाने हल्ला चढवला आहे. विजय वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली आहे. आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन मराठा क्रांती मोर्चाने ही मागणी केली.
पुणे येथे मराठा क्रांती मोर्चाने या पत्रकार परिषदेत सांगितलं की, राज्यातील 3 पक्षाच्या सर्कसमुळे मराठा समाजावर अन्याय होण्याची शक्यता आहे. सारथी समितीविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, ‘सारथी’विषयी एक समिती नेमण्यात आली. त्यानंतर अहवाल आला. परत दुसरी समिती नेमली. मात्र हा अहवाला समोर मांडला जात नाही. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राजीनामा द्यावा. त्यांच्याकडून या खात्याचा कारभार काढून घेण्यात यावा अशी मागणीही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. गेल्या वेळच्या सरकारकडून आमच्या अनेक मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. आता विजय वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणी आम्ही करत आहोत. सारथीची स्वायत्तता धोक्यात आणली आहे. विजय वडेट्टीवार हे मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत. खासदार संभाजीराजे यांच्या आंदोलनावेळी जो शब्द दिला होता, तो पाठण्यात यावा असेही यावेळी पत्रकारपरिषदेत सांगण्यात आले.