मराठा आरक्षण न्यायालयात टिकणार नाही : रामदास आठवले
खोपोली – मराठ्याने दिलेले आरक्षण कोर्टात टिकावे यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असताना दुसरीकडे मात्र केंद्रातील समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांना मराठा आरक्षण हे न्यायालयात टिकणार नाही, असे वाटते. मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी पुस्तीही त्यांनी पुढे जोडली.
खोपोली येथे पत्रकारांशी ते बोलत होते. मराठा आरक्षण न्यायालयात टिकेल का ? असा प्रश्न त्यांना केला असता ते म्हणाले, की मराठा आरक्षण न्यायालयात टिकणार नाही. देशात 75 टक्के आरक्षणाचा कायदा केल्यास आरक्षणाचा मुद्दा सुटणार आहे. आमचा मराठा आरक्षणाला पाठींबा आहे, मात्र ते न्यायालयात टिकणार नाही.
अयोध्येत राम मंदिर व्हायला हवे असे सांगताना ते म्हणाले, की राममंदिर बांधताना मुस्लिम समाजावर अन्याय होणार नाही याची काळजी घेणेही गरजेचे आहे. राम मंदिराची जागा ही बौद्ध धर्मियांची असून तेथे बुद्धविहार होते. मात्र सध्या वादग्रस्त जागा असल्याने त्या बदल्यात बौद्ध धर्मियांना दुसरीकडे जागा शासनाने द्यावी. मंदिर, पुतळे उभारले नाहीत तर मते मिळणार नाहीत असेही ते म्हणाले.