‘मराठा आरक्षणासाठी सरकारकडून सकारात्मक पाऊल’, अनिल परब यांची माहिती
मुंबई – मराठा आरक्षणावरून सध्या राज्यात राजकारण पेटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम स्थगितीनंतर विरोधकांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला तर, राज्य सरकारनेही मराठा आरक्षण मिळणारच असं ठापण सांगितले. यावर परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले की, “मराठा आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडी सरकार सकारात्मक पावले उचलत आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. पण ज्यांना कुणाला राजकारण करायचं असेल त्यांना ते करु द्या, समाजाच्या महत्त्वाच्या प्रश्नावरुन राजकारण करुन काही साध्य होणार नाही. शेवटी मराठा समाजाला न्याय मिळणे महत्त्वाचे आहे.”
ते पुढे म्हणाले की, “मराठा आंदोलकांना मी स्वत: जाऊन भेटलो आहे. त्यांचं निवेदन स्वीकारुन ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे देखील पाठवलं आहे. निवेदनात केलेल्या मागण्या अतिशय महत्त्वाच्या आहे. सरकार नक्कीच यासंदर्भात सकारात्मक विचार करेल, ज्यांना कुणाला राजकारण करायचे असेल त्यांनी ते करावं. सरकारला आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा आहे. सरकार मराठा आरक्षणाबाबत प्रमाणिक आहे”, असं अनिल परब म्हणाले.
मराठा आंदोलकांनी शनिवारी मातोश्रीवर मशाल मार्च काढला. यानंतर मंत्री अनिल परब यांनी मराठा आंदोलकांची भेट घेऊन त्यांना आश्वस्त केल्यानंतर मराठा क्रांती मशाल मार्च स्थगित करण्यात आला. अनिल परब आणि मराठा आंदोलकांमध्ये तासभर चर्चा पार पाडली. यानंतर मुख्यमंत्री दोन ते तीन दिवसांत मराठा आंदोलकांशी चर्चा करतील, असं आश्वासन अनिल परब यांनी दिल्यानंतर मराठा आंदोलकांनी मशाल मार्च स्थगित केला.