मराठा आंदोलन तापलं! आक्रोश दिंडी अडवली, समन्वयकांना घेतलं ताब्यात
पंढरपूर – मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन मराठा समाजानं पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा ठोक मोर्चाच्या वतीने शनिवारी ‘पंढरपूर ते मंत्रालय आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. नामदेव पायरीचं दर्शन घेऊन आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून सकल मराठा समाजाच्या पायी दिंडीला सुरूवात झाली आहे.
पंढरपुरातून पायी चालत मराठा कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मात्र, पंढरपूर पोलीस मुख्यालयासमोर मराठ्यांचा आक्रोश मोर्चा अडवण्यात आला आहे. पोलीस मराठा कार्यकर्त्यांना धरपकड करण्याच्या तयारीत असल्यानं वातावरण तापलं आहे. पोलीस आणि मराठा समन्वयकामध्ये बोलणी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. पंढरपूर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं पंढरपुरात संचारबंदी लागू केली आहे.
पंढरपूर पोलिसांनी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या समन्वयकांना ताब्यात घेतलं असून त्यांना पुण्याच्या दिशेने नेण्यात आलं आहे. पायी दिंडीला पोलिस प्रशासनानं परवानगी नाकारली आहे. दहा खासगी वाहनातून पोलीस बंदोबस्तात मराठा समन्वयक पुण्यामध्ये पोहोतील. त्यानंतर पुण्यात मुख्य सचिवांसोबत बैठक होईल, अशी माहिती मिळाली आहे.
आंदोलकांना ठेवलं नजरकैदेत…
दुसरीकडे, पंढरपूरकडे निघालेल्या मराठा तरुणांना पोलिसांनी अडवलं आहे. 144 कलम लागू असल्याने त्यांना पंढरपुरात जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला. कळंब पोलिसांनी आंदोलकांना नजरकैदेत ठेवलं आहे. 149 नुसार 12 कार्यकर्त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.