मन की बात : मोदींचं सरदार पटेलांना अभिवादन, ‘रन फॉर युनिटी’मध्ये सहभागी होण्याचं आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवर मन की बात कार्यक्रमाद्वारे देशवासियांना संबोधित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा 49वा मन की बात कार्यक्रम होता. दरमहिन्याच्या अखेरच्या रविवारी पंतप्रधान या कार्यक्रमाद्वारे देशातील जनतेला संबोधित करतात. या कार्यक्रमाद्वारे मोदी देश-विदेशातील विविध मुद्द्यांवर आपलं मत मांडत असतात.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला पंतप्रधान मोदींनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केलं. दोन दिवसांनंतर म्हणजेच 31 ऑक्टोबर रोजी सरदार पटेल यांची जयंती आहे. यावेळी, गुजरातमध्ये तयार होत असलेला सरदार वल्लभभाई पटेल यांचा बहुचर्चित आणि जगातला सर्वांत मोठा पुतळ्याचं 31 ऑक्टोबरला अनावरण करणार असल्याची माहिती मोदींनी दिली. अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ ऑफ लिबर्टीच्या जवळपास दुप्पट उंची सरदार पटेल यांच्या हा स्टॅच्यू ऑफ यूनिटीची असेल असं ते म्हणाले. सरदार पटेल यांनी कठीण प्रसंगात देशाला सावरले, त्यांनी देशात एकात्मता निर्माण करण्याचं कठीण काम केलं. टाइम मॅगझिननेही पटेल यांच्या योगदानाची दखल घेतली, असं मोदी म्हणाले. यावेळी बोलताना मोदींनी पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशातील सर्व तरुणांना ‘रन फॉर युनिटी’मध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं. त्यानंतर बोलताना मोदींनी, 11 नोव्हेंबर रोजी पहिल्या महायुद्धाला 100 वर्ष पूर्ण होत असल्याचं सांगत मोदींनी भारतीय सैनिकांच्या शौर्याचा उल्लेख केला. त्या महायुद्धातील आपल्या कर्तुत्वाने आमच्या सैनिकांनी युद्ध करण्याची वेळ आली तर आम्ही कुठेही कमी पडू शकत नाहीत हे जगाला दाखवून दिलं असं मोदी म्हणाले. याशिवाय, २०१८ मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी केल्याबद्दल मोदींनी खेळाडूंचं कौतुक केलं. तसंच भारतीय हॉकी टीमला वर्ल्ड कप जिंकण्यासाठी मोदींनी शुभेच्छाही दिल्या.