माळीणप्रमाणे तिवरे धरणग्रस्तांचे पुनर्वसन करा; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई – रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली. यामध्ये लोकांची घरे, पीकं आणि शेतजमीनीही वाहून गेल्या. राज्य सरकारने पीडितांना दिलेली ४ लाखांची मदतही तुटपुंजी आहे. यातून मार्ग काढण्यासाठी पुणे जिल्ह्यातील माळीण गावाप्रमाणे इथल्या लोकांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
तिवरे धरणफुटी प्रकरणाचा प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पवार यांनी आढावा घेतला होता. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र लिहून वस्तुस्थिती विशद केली. शरद पवार यांनी ८ जुलै रोजी तिवरे धरणग्रस्तांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दुर्घटनेत झालेल्या जीवित आणि वित्तहानीबाबत माहिती घेतली. त्याचबरोबर पीडितांशी संवादही साधला. पीडितांनी त्यांच्यासमोर वस्तुस्थिती मांडली. दरम्यान, या सर्व परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर बाधीत कुटुंबांचे योग्य पुनर्वसन करुन त्यांना सार्वजनीक मुलभूत सुविधा वेगाने पुर्नस्थापित करुन द्याव्यात, अशी मागणी शरद पवार यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली.